खाकीची धडक कारवाई! ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या व्यापाऱ्याची ६ तासांत सुटका; व्यापारी वर्गाकडून पोलीस आयुक्तांचा जंगी सत्कार
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी: बालाजी नवले, ११ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : रहाटणी परिसरातून एका व्यापाऱ्याचे अपहरण करून ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आंतरराज्य टोळीला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवघ्या ६ तासांत जेरबंद केले. पोलिसांच्या या ‘सुपरफास्ट’ आणि धाडसी कामगिरीबद्दल समस्त व्यापारी वर्गाच्या वतीने पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त शिवाजी पवार यांचा विशेष सत्कार करून आभार मानण्यात आले.
रहाटणी भागात स्वतःला ‘उत्तर प्रदेश पोलीस’ असल्याचे भासवून पाच जणांनी एका व्यापाऱ्याचे अपहरण केले होते. आरोपींनी व्यापाऱ्याच्या जीवाच्या बदल्यात ५० लाख रुपयांची मागणी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्तांनी तात्काळ गुन्हे शाखेच्या विविध पथकांना तपासाचे आदेश दिले.
तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. सुमारे १०० किलोमीटरपर्यंत थरारक पाठलाग केल्यानंतर, संगमनेर येथील टोल नाक्यावर पोलिसांनी वेढा घातला आणि व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली. या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून पिस्तुल आणि काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत.
व्यापाऱ्याची सुरक्षित सुटका झाल्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. पोलिसांच्या या सजगतेबद्दल आणि कर्तव्यदक्षतेबद्दल व्यापारी परिवाराच्या वतीने पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन सत्कार करण्यात आला.
नगरसेवक हिरानंद उर्फ डब्बू शेठ आसवाणी, सुरेश जेसवाणी, विजय रामनानी, डॉ. कृष्णन वीरवाणी, सुनील केसवाणी, राज कुमार, घनश्याम ललवाणी, महेंद्र पाणीवाणी, झामन दास, श्रीचंद मंधान, सनी गोविया यांसह अनेक व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते.
“शहरातील व्यापारी सुरक्षित राहतील, याची खात्री या कारवाईने दिली आहे. उत्तर प्रदेशपर्यंत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांना महाराष्ट्रातच रोखून पोलिसांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे.”
— डब्बू शेठ आसवाणी, नगरसेवक व व्यापारी नेते.
अशा प्रकारच्या कोणत्याही संशयास्पद हालचाली किंवा खंडणीचे फोन आल्यास घाबरून न जाता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी यावेळी केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।
