news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमध्ये कामगारांची उपासमार थांबवण्यासाठी ‘कष्टकरी संघर्ष महासंघ’ आक्रमक

पिंपरी-चिंचवडमध्ये कामगारांची उपासमार थांबवण्यासाठी ‘कष्टकरी संघर्ष महासंघ’ आक्रमक

शिवभोजन केंद्रांची संख्या वाढवण्याची मागणी; गॅस तुटवड्यामुळे कंपन्या ठप्प झाल्याने कामगारांपुढे आर्थिक संकट | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

संकटातील कामगारांसाठी ‘कम्युनिटी किचन’ सुरू करा; कष्टकरी संघर्ष महासंघाची सरकारकडे मागणी

 

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दिनांक: ८ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: अमेरिका, इस्रायल आणि इराण दरम्यान निर्माण झालेल्या जागतिक तणावाचा फटका आता स्थानिक औद्योगिक क्षेत्राला बसू लागला आहे. औद्योगिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अनेक कंपन्यांचे काम ठप्प झाले असून, हातावर पोट असलेल्या कामगारांच्या जेवणाचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर, संकटात सापडलेल्या कामगारांसाठी ‘कम्युनिटी किचन’ (सामूहिक भोजन) सुविधा सुरू करावी आणि शिवभोजन थाळी केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी कष्टकरी संघर्ष महासंघाने केली आहे.

कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांना उद्देशून लिहिलेले निवेदन पिंपरी चिंचवडचे अप्पर तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

निवेदनात नमूद केल्यानुसार, जागतिक परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्यामुळे महाराष्ट्रातील आणि विशेषतः पुणे-पिंपरी चिंचवड औद्योगिक पट्ट्यातील कामगारांचे काम गेले आहे. हाताला काम नसल्याने आणि पगार मिळत नसल्याने कामगार गावी परतण्यासाठी लागणारा खर्चही करू शकत नाहीत. ठेकेदार आणि कंपनी व्यवस्थापनाकडूनही अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने कामगारांची स्थिती बिकट झाली आहे. ही परिस्थिती कोरोना काळातील संकटासारखीच असल्याची भावना महासंघाने व्यक्त केली.

कष्टकरी संघर्ष महासंघाने प्रशासनाकडे एक विशेष प्रस्ताव मांडला आहे:

  • जागा व सिलेंडर उपलब्ध करून द्या: प्रशासनाने तात्पुरती जागा आणि गॅस सिलेंडरची उपलब्धता करून दिल्यास, महासंघाच्या वतीने कामगारांना मोफत जेवण देण्याची व्यवस्था करण्यात येईल.

  • शिवभोजन थाळीची व्याप्ती वाढवा: शहरातील शिवभोजन केंद्रांची संख्या वाढवून किमान १० ठिकाणी नवीन केंद्रे सुरू करण्यात यावीत, जेणेकरून जास्तीत जास्त कामगारांना अल्पदरात जेवण मिळेल.

निवेदन देताना कामगार नेते काशिनाथ नखाते, मनपा सदस्य राजू बिराजदार, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, सहदेव होणमने, मनोज यादव, मनोज रूपनर, नामदेव राजपुरे, अंबालाल सुखावाल, सचिन कांबळे, रज्जाक शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीचा फटका तळागाळातील कामगारांना बसत असल्याने, सरकारने याकडे तातडीने लक्ष देऊन मानवतावादी दृष्टिकोनातून निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा कष्टकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!