39
देशात ‘घर घर बेरोजगार’; प्रत्येकाच्या हाताला काम देण्यासाठी १५ ऑगस्टला पिंपरी महापालिकेसमोर तरुणांचा भव्य एल्गार!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १२ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: “देशात सध्या ‘घर घर बेरोजगार’ अशी अत्यंत बिकट आणि भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. रोजगाराच्या अभावामुळे संपूर्ण देशालाच जणू घरघर लागली आहे. देशातील प्रत्येक तरुणाला रोजगाराची सन्मानजनक संधी उपलब्ध करून देण्यासाठी १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनापेक्षा दुसरा कोणताही योग्य मुहूर्त असू शकत नाही. प्रत्येक नागरिकाच्या हाताला काम मिळेल, प्रत्येक कुटुंब दारिद्र्यरेषेच्या बाहेर पडेल आणि सर्वांना शिक्षण व रोजगाराची समान संधी मिळेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने देशाला स्वातंत्र्य मिळाले असे म्हणता येईल,” असा घणाघाती आरोप छत्रपती शासन पक्षाचे राष्ट्रीय पक्षप्रमुख प्रा. नामदेवराव जाधव सर यांनी केला आहे.
याच पार्श्वभूमीवर, झोपलेल्या प्रशासनाला अन् सरकारला खडबडून जागे करण्यासाठी आणि तरुणांच्या रोजगाराच्या हक्कासाठी स्वातंत्र्यदिनी, म्हणजेच १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या बाजूला असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (पिंपरी) येथे भव्य जनआंदोलन व एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
हा लढा केवळ एका पक्षापुरता मर्यादित नसून, संपूर्ण युवा पिढीच्या भविष्यासाठी उभारला जात आहे. सनय (छत्रपती शासन पक्ष) यांच्या मुख्य आयोजनाखाली शहरातील सर्व समविचारी राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, तरुण संघटना आणि विविध सार्वजनिक मंडळांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील उद्योगनगरीत स्थानिक तरुणांना रोजगारात डावलले जात असल्याचा आणि प्रशासनाच्या बेरोजगारीबाबतच्या उदासीन धोरणांचा या वेळी तीव्र निषेध नोंदवला जाणार आहे.
प्रशासकीय यंत्रणा आणि धोरणकर्त्यांना थेट इशारा देताना प्रा. नामदेवराव जाधव सर यांनी स्पष्ट केले की, देशातील तरुणांचा संयम आता सुटत चालला आहे. कागदोपत्री दाव्यांपेक्षा प्रत्यक्षात हाताला काम हवे आहे.
“शिक्षणाची पदवी हातात असूनही आजचा तरुण बेरोजगार फिरत आहे. जोपर्यंत प्रत्येकाला रोजगाराची समान संधी मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही. आपल्या हक्काच्या रोजगारासाठी आणि भविष्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर व जिल्ह्यातील तमाम तरुणांनी १५ ऑगस्टला सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ मोठ्या संख्येने एकत्र यावे.”— प्रा. नामदेवराव जाधव सर (राष्ट्रीय पक्षप्रमुख, छत्रपती शासन पक्ष)
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच महापालिकेच्या आणि सरकारच्या बेरोजगारीविरोधी धोरणांवर बोट ठेवले जाणार असल्याने पालिका व पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून बेरोजगार युवकांचा बुलंद आवाज थेट शासनापर्यंत पोहोचवण्याचा ठाम निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
