39
चाकणमधील कारखान्यांचे स्थलांतर थांबवा; उद्योग आणि कामगार वाचवा : काशिनाथ नखाते!
चाकण प्रतिनिधी बालाजी नवले , दि. १४ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी :चाकण एमआयडीसी (MIDC) परिसरातील तीव्र वाहतूक कोंडी, निकृष्ट दर्जाचे रस्ते, अपुरा वीजपुरवठा आणि मूलभूत पायाभूत सुविधांच्या अभावामुळे तब्बल २० कंपन्या व उद्योग इतर राज्यांत किंवा अन्य ठिकाणी स्थलांतर करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने केवळ घोषणा न करता तातडीने ठोस पावले उचलावीत आणि “कारखाने वाचवा, कामगार वाचवा” ही भूमिका घेऊन हे स्थलांतर रोखावे, अशी जोरदार मागणी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली आहे.
नखाते यांनी सांगितले की, उद्योगांना आवश्यक असलेले पोषक वातावरण निर्माण करण्यात शासन अपयशी ठरल्याने उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी आहे. चाकण हे जागतिक स्तरावर नावाजलेले औद्योगिक केंद्र असून, या भागाचा पुणे जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात मोठा वाटा आहे. येथील कारखाने बाहेर गेल्यास हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल व स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल.
वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी रस्ते रुंदीकरण व दुरुस्ती युद्धपातळीवर करावी. उद्योगांना सतत वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा आणि कच्चा व तयार मालाच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी. उद्योग टिकवण्यासोबतच कामगारांना किमान व समान वेतन आणि सुरक्षित कामाचे वातावरण मिळावे.
“चाकण एमआयडीसी वाचली तरच उद्योग, रोजगार आणि हजारो कामगारांचे भविष्य सुरक्षित राहील. शासनाने केवळ चर्चेपुरते न थांबता तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावेत, अन्यथा कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.”— काशिनाथ नखाते (अध्यक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघ)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
