13
सम्राट अशोक यांची जयंती राष्ट्रीय स्तरावर साजरी करा, गाजर गवत निर्मूलनाची मोहीम राबवा; वृक्षमित्र प्रवीण वासनिक यांचे खासदार बळवंत वानखडे यांना निवेदन!
अमरावती, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. २१ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: भारताचे महान सम्राट अशोक यांची जयंती राष्ट्रीय स्तरावर भारतभर शासकीय उत्सवाच्या स्वरूपात साजरी करण्यात यावी आणि देशासाठी घातक ठरत असलेले गाजर गवत (Parthenium) नष्ट करण्यासाठी ‘गाजर गवत निर्मूलन’ ही राष्ट्रव्यापी मोहीम राबवण्यात यावी, या मुख्य मागण्यांचे निवेदन ‘सर्वांगीण ग्रामीण विकास प्रशिक्षण संस्थे’चे अध्यक्ष, अमरावती जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते तथा वृक्षमित्र प्रवीण वासनिक यांनी अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांना त्यांच्या कार्यालयात भेट देऊन सादर केले.
या प्रसंगी प्रवीण वासनिक यांनी खासदार बळवंत वानखडे यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लोकशाहीला असलेला धोका’ हे पुस्तक देऊन स्वागत केले आणि उभयतांमध्ये विविध सामाजिक व पर्यावरणीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
जगामध्ये अनेक राजे-महाराजे होऊन गेले, परंतु २३०० वर्षांनंतरही सम्राट अशोक यांनी केलेल्या महान कार्यामुळे त्यांना अनन्यसाधारण ऐतिहासिक महत्त्व आहे. सम्राट अशोक यांनी देशात ८४ हजार बौद्ध विहार आणि शिलालेखांची निर्मिती केली. सारनाथ येथील अशोक स्तंभाचा मुख्य भाग भारताचे ‘राष्ट्रीय चिन्ह’ म्हणून स्वीकारण्यात आला आहे. तसेच राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी असलेले ‘अशोक चक्र‘ हे परिवर्तनशीलता आणि प्रगतीचे प्रतीक आहे. राष्ट्रपती भवन, शासकीय कार्यालये, नाणी व नोटांवरही अशोक चिन्ह प्रामुख्याने वापरले जाते. देशात अनेक थोर पुरुषांच्या व राजकीय नेत्यांच्या जयंत्या मोठ्या प्रमाणावर साजरी केल्या जातात, परंतु शासन स्तरावर सम्राट अशोक यांची जयंती साजरी केली जात नाही, ही खेदाची बाब आहे. त्यामुळे भारत सरकार व महाराष्ट्र सरकारने सम्राट अशोकांची जयंती देशभरात शासकीय उत्सवाच्या स्वरूपात साजरी करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
वाढते गाजर गवत ही संपूर्ण भारतापुढील एक अत्यंत गंभीर समस्या बनली असून, याकडे शासन व समाजाचे दुर्लक्ष होत असल्याचे वासनिक यांनी निदर्शनास आणून दिले. संपूर्ण भारतात सुमारे ३५ दशलक्ष (३५० लक्ष) हेक्टर, तर महाराष्ट्रात १२ लक्ष हेक्टर क्षेत्र गाजर गवताने व्यापले आहे. यामुळे ९० टक्के चाऱ्याचे प्रमाण घटून दुग्ध व्यवसायावर गदा आली आहे. गाजर गवतामुळे देशातील ४० टक्के अन्नधान्य उत्पादन घटले असून, त्याचा फटका शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर बसत आहे. तसेच या गवतामुळे देशातील ७ टक्के नागरिक दमा, अस्थमा आणि त्वचेच्या गंभीर आजारांना बळी पडत आहेत.
पर्यावरण, शेती आणि मानवी आरोग्यावरील हे दुष्परिणाम पाहता गाजर गवत निर्मूलनासाठी सरकारने राष्ट्रव्यापी मोहीम हाती घेणे काळाची गरज आहे. या दोन्ही अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या मागण्या शासन व संसद स्तरावर लावून धरू, असे ठोस आश्वासन खासदार बळवंत वानखडे यांनी या प्रसंगी दिले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
