बालगृह ‘वझ्झर मॉडेल’ म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न: जिल्हाधिकारी आशिष येरेकर
जिल्हाधिकाऱ्यांची वझ्झर बालगृहाला भेट, पद्मश्री डॉ. शंकरबाबा पापळकर यांच्यासोबत महत्त्वपूर्ण चर्चा; विद्यार्थ्यांचे मानधन वाढवण्यासह अनेक मागण्या शासनाकडे सादर करणार!
अमरावती, प्रतिनिधी अविनाश वानखेडे दि. ९ जुलै २०२५: जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज अचलपूर तालुक्यातील वझ्झर फाटा येथील स्व. अंबादास पंत वैद्य मतिमंद व मूकबधिर बालगृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी पद्मश्री डॉ. शंकरबाबा पापळकर यांच्यासोबत एक तास चर्चा केली आणि बालगृहाला ‘वझ्झर मॉडेल’ म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली. या भेटीदरम्यान त्यांनी बालगृहाच्या कामकाजाची पाहणी केली, विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि विविध विकासकामांचा आढावा घेतला.
वझ्झर बालगृहाला ‘मॉडेल’ बनवण्याचे प्रयत्न:

भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण बालगृहाची पाहणी केली आणि मतिमंद व मूकबधिर विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या गरजा समजून घेतल्या. परिसरात विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांचीही त्यांनी पाहणी केली. संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. शंकरबाबा पापळकर यांच्यासोबत त्यांनी विविध विषयांवर सखोल चर्चा केली. चर्चेदरम्यान बालगृहाशी संबंधित महत्त्वाचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याबाबत विनंती करण्यात आली. यामध्ये:
- बालगृहाला ‘वझ्झर मॉडेल’ म्हणून घोषित करणे.
- विद्यार्थ्यांचे मानधन पाच हजार रूपयांपर्यंत वाढवणे.
- विद्यार्थ्यांना आजीवन बालगृहात ठेवण्याची परवानगी देणे.
- वझ्झर मॉडेल विभागीय स्तरावर सुरू करणे.
या सर्व मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रस्ताव शासनास सादर करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी. एम. पुंड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सोंदळे आदी उपस्थित होते.
चांदूर बाजार तहसील कार्यालय आणि टोंगलापूर रोपवाटिकेचा आढावा:

दरम्यान, जिल्हाधिकारी येरेकर यांनी आज चांदूर बाजार तहसील कार्यालय येथे महसूलविषयक बाबींचा आढावा घेतला. महसूल विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेऊन त्यांनी सूचना केल्या.
यासोबतच त्यांनी टोंगलापूर येथील मनरेगा अंतर्गत तयार करण्यात आलेल्या सामाजिक वनीकरण रोपवाटिकेला भेट दिली. याठिकाणी असलेल्या कलमांची चौकशी करून माहिती घेतली. रोपे वितरित करताना झाडावर त्यांचे नाव आणि त्यांचा उपयोगाबाबत फलक लावण्याच्या सूचना सामाजिक वनीकरण विभागास दिल्या, जेणेकरून जनजागृती होईल.
यावेळी तालुका पालक महसूल उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, अचलपूर उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव, प्रभारी तहसीलदार श्री. तिवारी, नायब तहसीलदार श्री. सोनारकर, तालुका कृषी अधिकारी फाल्गुनी ननीर, गटविकास अधिकारी निलेश वानखडे उपस्थित होते.
बैठकीत घरकुल लाभार्थ्यांना वाळू वाटप, नैसर्गिक आपत्ती, आपले सरकार आणि पीजी पोर्टलवरील प्राप्त तक्रारी, शेतकरी आत्महत्या, संजय गांधी योजना आणि श्रावणबाळ योजनेसाठी आधार प्रमाणीकरण, अॅग्रीस्टॅक याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्राम महसूल अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील शीतगृहाची पाहणी:
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी अचलपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळभाज्या आणि इतर शेतमालाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या शीतगृहाचीही पाहणी केली. यावेळी तहसीलदार संजय गरकल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आणि सार्वजनिक बांधकाम (विद्युत) विभागाचे कार्यकारी अभियंता रोहन पाटील उपस्थित होते.
सदर शीतगृहाची साठवणूक क्षमता १० मेट्रिक टन असून, यात फळे आणि भाज्या दीर्घकाळ टिकवून ठेवण्याची क्षमता आहे. यासाठी आवश्यक असलेली सापेक्ष आर्द्रता देखील राखली जाते. शीतगृहाच्या आत बाष्पीभवन युनिट आणि बाहेर कंडेन्सर युनिट असलेल्या ‘स्प्लिट’ प्रकारच्या प्रणाली बसविण्यात आल्या आहेत. सदर शीतगृह १० किलोवॅट क्षमतेचे असून, सौर ऊर्जेवर चालते. यामध्ये बायफेशियल सोलर पॅनेल वापरले आहेत, जे कमी प्रकाशातही वीज निर्माण करतात. शीतगृह अत्याधुनिक सेन्सर्सनी सुसज्ज आहे. हे सेन्सर्स फळे आणि भाज्यांमधून निर्माण होणारे अनावश्यक व हानिकारक वायू शोधून त्यांना शीतगृहातून बाहेर काढतात, ज्यामुळे फळे आणि भाज्या अधिक कालावधीसाठी साठवता येतात. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांसाठी आधुनिक सोय निर्माण झाली आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
