सोलापूरला ‘ओला दुष्काळ’ जाहीर करा, शहरातील नाल्यांची योजना प्राधिकरणाकडे द्या
खासदार प्रणिती शिंदे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
मुंबई, प्रतिनिधी :- पंडित गवळी (सोलापूर) १६ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
सोलापूर शहर आणि जिल्ह्याला अतिवृष्टी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. यामध्ये त्यांनी सोलापूर जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची आणि शहरातील १९ नाल्यांच्या ९९ कोटी रुपयांच्या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मदतीने करण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांचे प्रश्न आणि पंचनाम्याची मागणी
निवेदनात खासदार शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील नरखेड व सावळेश्वर मंडळातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. या मंडळांमध्ये ६५ मिमी पेक्षा कमी पावसाची नोंद झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे व घरांचे पंचनामे झाले नाहीत, पण प्रत्यक्षात काही गावांमध्ये ७० ते ७५ मिमी पाऊस पडल्याने मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागले. त्यामुळे ६५ मिमीची अट शिथिल करून सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी त्यांनी केली.
खासदार प्रणिती शिंदे यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे:
- नुकसान भरपाई: अतिवृष्टीमुळे ज्यांची घरे पडली आहेत, त्यांचे पंचनामे करून तातडीने मदत द्यावी.
- रस्ते आणि पूल दुरुस्ती: वाहून गेलेले रस्ते, पूल आणि बंधारे त्वरित दुरुस्त करून वाहतूक सुरळीत करावी.
- गाव स्थलांतर: अक्कलकोट तालुक्यातील शिरशी, मोटयाळ आणि संगोगी (बु) गावांचे स्थलांतर करून पुनर्वसन करावे.
- निकृष्ट कामे: पंतप्रधान ग्राम सडक योजना (PMGSY) आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजना (CMGSY) अंतर्गत झालेल्या निकृष्ट कामांची दुरुस्ती करून दोषींवर कारवाई करावी.

शहरी समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज
शहरातील पाणी तुंबण्याच्या समस्येवरही खासदार शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. “शहरात केवळ तीन तासांचा पाऊस पडला तरी महापालिका यंत्रणा कोलमडते,” असे त्यांनी म्हटले. सोलापूर शहराच्या या बिकट परिस्थितीसाठी ‘स्मार्ट सिटी’ आणि ‘अमृत’ योजनेतील त्रुटी आणि अपुऱ्या ड्रेनेज लाईन कारणीभूत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
शहरातील प्रश्नांवर खासदार शिंदे यांनी केलेल्या प्रमुख मागण्या:
१) अतिवृष्टीमुळे ज्यांची घरे पडझड झाली आहेत, त्यांचे पंचनामे करून तातडीने मदत द्यावी.
२) ज्या मंडळात ६५ मिमीपेक्षा कमी पावसाची नोंद असली तरी प्रत्यक्षात ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे, अशा ठिकाणी सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.
३) सोलापूर शहरातील स्ट्रॉम ड्रेन लाईन सुधारण्यासाठी विशेष योजना तयार करून निधी द्यावा तसेच चुकीच्या नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह पूर्ववत करावा.
४) अमृत योजनेतील त्रुटीपूर्ण ड्रेनेज लाईनमुळे पाणी साचते, ती योग्य प्रकारे दुरुस्त करावी.
५) अतिवृष्टीमुळे वाहून गेलेले रस्ते, पूल, बंधारे व बँरॅकेट दुरुस्त करून वाहतुकीस सुरक्षित करावे.
६) अक्कलकोट तालुक्यातील शिरशी, मोटयाळ, संगोगी (बु) गावे स्थलांतरित करून पुनर्वसन करावे.
७) प्रत्येक बंधारा व पुलावर क्रॅशगार्ड बसविण्यात यावा.
८) कुरनुर धरणातून पूर्वसूचना न देता पाणी सोडल्याने गावांमध्ये झालेले मोठे नुकसान भरून काढावे.
९) संगोगी (बु) येथील बंधाऱ्याचे मोठे नुकसान दुरुस्त करावे; कारण तो शेतकऱ्यांच्या दळणवळणासाठी धोकादायक ठरत आहे.
१०) शिरशीवाडी तलाव कमकुवत झाल्याने तो कधीही फुटण्याचा धोका असल्याने तातडीने दुरुस्ती करावी.
११) पीएमजीएसवाय व सीएमजीएसवाय अंतर्गत झालेले निकृष्ट दर्जाचे रस्त्यांचे कामे दुरुस्त करून दोषींवर कारवाई करावी.
१२) मोदी वसाहतीतील रेशन दुकानातील तांदळात मृत साप आढळल्याने त्यावर गंभीर कार्यवाही करावी.
१३) गायरान जमीन गावठाणात रूपांतरित करावी. गावठाण जमीन उपलब्ध नसेल तर गायरान जमिनीवर घरकुल बांधण्याची परवानगी द्यावी. अनेक वर्षांपासून राहात असलेल्या घरांना नियमित करावे.
१४) सोलापूर शहरातील दरवर्षीच्या पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी तुंबण्याच्या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना व्हावी, यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन निवेदन सादर केले.
यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे सातलिंग शटगार, अक्कलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी, मंगळवेढा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत साळे, उत्तर सोलापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भारत जाधव, मा. नगरसेवक प्रवीण निकाळजे, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश अप्पा पवार, संदीप पाटील, कार्याध्यक्ष सुशील बंदपट्टे, मिडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, मा. नगरसेवक किरणराज घाडगे, मंगळवेढा युवक अध्यक्ष रविकिरण कोळेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
