संपादकीय: एका दगडात दोन पक्ष मारले! शरद पवारांची ‘पॉवर’फुल खेळी; बारामतीतून दिला मोठा राजकीय संदेश
बारामती , ३१ जानेवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
बारामती : राजकारणातील चाणक्य मानले जाणारे शरद पवार जेव्हा शांत असतात, तेव्हा ते मोठ्या वादळाची तयारी करत असतात, याची प्रचिती आज बारामती येथे झालेल्या त्यांच्या पत्रकार परिषदेतून पुन्हा एकदा आली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत शरद पवारांनी अत्यंत मोजक्या शब्दांत जी फटकेबाजी केली, त्याने एकाच दगडात दोन पक्ष मारण्याची (भाजप आणि अजितदादांचा गट) किमया साधली आहे. पुढच्या पिढीतील राजकारण्यांसाठी ही पत्रकार परिषद म्हणजे ‘पॉलिटिकल मास्टरक्लास’ ठरली आहे.
१. शपथविधीबाबत अज्ञान आणि अलिप्तता:
“शपथविधी होणार आहे हे मला माहितच नव्हते,” असे विधान करून पवारांनी या संपूर्ण सत्तानाट्यापासून स्वतःला आणि स्वतःच्या पक्षाला पूर्णपणे अलिप्त ठेवले. या खेळात आम्ही भागीदार नाही, हे त्यांनी स्पष्टपणे जनतेच्या मनावर बिंबवले.
२. पटेल आणि तटकरेंवर निशाणा:
या निर्णयामागे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचाच हात असल्याचे सूचित करून पवारांनी या दोन्ही नेत्यांना जनतेसमोर ‘एक्सपोज’ केले. या निर्णयाचे खापर थेट त्यांच्यावर फोडून पवारांनी आपली बाजू सुरक्षित केली.
३. विलीनीकरणाची भीती आणि भाजपची कोंडी:
“एवढ्या घाईत हा निर्णय का झाला ते माहीत नाही,” असे सांगतानाच त्यांनी एक गुपित उघड केले. भाजप, पटेल आणि तटकरे हे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला घाबरत आहेत, म्हणूनच त्यांनी ही घाई केली, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला.
४. दादांची ‘अंतिम इच्छा’ आणि सामान्य कार्यकर्ता:
सर्वात मोठा धक्का म्हणजे १२ तारखेला विलीनीकरण होणार होते, हे सांगणे. सध्याचे नेते जे वागत आहेत ते दादांच्या अंतिम इच्छेविरुद्ध आहे, हे सांगून त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांच्या मनातील सहानुभूती आपल्याकडे वळवून घेतली. “दादांचा खरा वारसदार मीच,” हा संदेश त्यांनी अधोरेखित केला.
५. पवार कुटुंबियांची भूमिका स्पष्ट:
अस्थी विसर्जनानंतर सुनेत्रा वहिनींचा कुटुंबाशी संवाद झालेला नाही, हे सांगून उर्वरित पवार कुटुंब या राजकीय निर्णयाच्या पाठीशी नाही, हे त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेच्या आधी काल पवारांनी नीरा नदीची केलेली पाहणी हा निव्वळ योगायोग नव्हता. बारामतीचा राजकीय सातबारा मी अजितदादांच्या नावे केला होता, मात्र त्यांच्या निधनानंतर आता मूळ मालकाने तो पुन्हा स्वतःच्या नावावर घेतला आहे, हाच तो गर्भित इशारा होता.
किमान शब्दांत कमाल अर्थ पोहोचवणे यालाच ‘पवार शैली’ म्हणतात. बारामतीतून सुटलेले हे राजकीय वारे आता राज्याच्या राजकारणात कोणती नवी वळणे घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. धुरंदर राजकारणी काय असतो, हे पवारांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
