‘२०४७ च्या विकसित भारतासाठी तरुणांनी राजकारणात यावे’; १५ व्या भारतीय छात्र संसदेत भाजप सरचिटणीस तरुण चुघ यांचे आवाहन
पिंपरी/पुणे प्रतिनिधी बालाजी नवले, २३ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नेशन फर्स्ट’ ही भावना उराशी बाळगून १ लाख तरुणांना राजकारणात येण्याचे आवाहन केले आहे. २१ वे शतक हे भारताचे असून भविष्यात जगभरात देशाचा गौरव करण्यासाठी आणि २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडवण्यासाठी युवकांनी आता देशाची सूत्रे हाती घेतली पाहिजेत,” असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १५ व्या भारतीय छात्र संसदेच्या दुसऱ्या दिवशी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड होते. यावेळी कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
तरुण चुघ यांनी आपल्या भाषणात भारताच्या बदलत्या जागतिक प्रतिमेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “एक काळ असा होता जेव्हा भारत जगाकडे मागणी करत असे, परंतु गेल्या १२ वर्षांत हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला असून ७.५ च्या जीडीपीने प्रगती करत आहे. आता जगभरातील देश भारताशी जोडले जाण्यासाठी उत्सुक आहेत.”
तरुणांना संबोधित करताना चुघ म्हणाले की, जगात भारतामध्ये सर्वात जास्त स्टार्टअप्स आहेत. “दिल्लीत झालेल्या एआय (AI) समिटमध्ये लाखो लोक सहभागी झाले होते, यावरून हे स्पष्ट होते की तंत्रज्ञानाच्या युगात भारत कुठे असेल हे आताचे युवकच ठरवतील. विद्यार्थ्यांनी केवळ उद्याचे नागरिक म्हणून नव्हे, तर आजचे सजग नागरिक म्हणून देशाच्या समस्यांवर उपाय शोधले पाहिजेत,” असेही त्यांनी नमूद केले.
ऐतिहासिक संदर्भ देताना त्यांनी अलेक्झांडर, मुघल आणि ब्रिटिशांवरील भारतीयांच्या विजयाची आठवण करून दिली. “१९६५ आणि १९७१ च्या युद्धातील शौर्य असो किंवा आजचे डिजिटल इंडियाचे यश असो, प्रत्येक मोठ्या बदलामागे तरुणाईची शक्ती उभी राहिली आहे. तरुणांनी आता छोटी ध्येये न ठेवता मोठी स्वप्ने पाहावीत आणि मानवतेच्या मार्गावर चालत देशाला बलवान बनवावे,” असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
