मुंबईतील फेरीवाल्यांना न्याय मिळणार! महापौर रितूताई तावडे यांचे सकारात्मक आश्वासन; ‘पथ विक्रेता’ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी
विशेष प्रतिनिधी: मुंबई, १३ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
मुंबई : मुंबईच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा कणा असलेल्या फेरीवाल्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आज फेरीवाला महासंघाच्या वतीने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नवनियुक्त महापौर रितूताई तावडे यांची भेट घेण्यात आली. महानगरपालिका भवन येथे झालेल्या या बैठकीत फेरीवाल्यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, “प्रामाणिक विक्रेत्यांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही,” अशी ग्वाही महापौरांनी यावेळी दिली.
बैठकीदरम्यान महापौरांनी मान्य केले की, शहराच्या दैनंदिन जीवनात आणि अर्थव्यवस्थेत फेरीवाल्यांचे योगदान मोठे आहे. ज्या विक्रेत्यांचे नाव सर्वेक्षणामध्ये आहे आणि जे अनेक वर्षांपासून व्यवसाय करत आहेत, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे हे प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
फेरीवाला महासंघाच्या वतीने महापौरांकडे खालील मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले:
-
कायद्याची अंमलबजावणी: ‘पथ विक्रेता (उपजीविकेचे संरक्षण व पथ विक्री विनियमन) अधिनियम’ याची मुंबईत प्रभावी अंमलबजावणी करावी.
-
ओळखपत्र वितरण: प्रलंबित असलेली सर्वेक्षण प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पात्र फेरीवाल्यांना अधिकृत ओळखपत्रे देण्यात यावीत.
-
सुरक्षित वातावरण: हॉकर्स झोनची निर्मिती करून फेरीवाल्यांना सन्मानाने आणि भीतीमुक्त वातावरणात व्यवसाय करण्याची संधी मिळावी.
“फेरीवाल्यांना केवळ आश्वासने नको तर ठोस कृती हवी आहे. न्याय, सन्मान आणि सुरक्षित व्यवसायाचे वातावरण मिळेपर्यंत आमचा लढा अधिक तीव्र राहील,” असा पवित्रा महासंघाच्या प्रतिनिधींनी यावेळी घेतला. महापौरांच्या आश्वासनानंतर आता पालिका प्रशासन प्रत्यक्ष जमिनीवर काय पावले उचलते, याकडे लाखो फेरीवाल्यांचे लक्ष लागले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


