शहीदांचे बलिदान कृतीतून जिवंत ठेवणे हीच खरी आदरांजली! कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना चिंचवडमध्ये अभिवादन
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : आकाश कांबळे,२३ मार्च २०२६ | मॅक्स मंथन विशेष:
चिंचवड : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील धगधगते अग्निकुंड असलेले शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदान दिनानिमित्त (शहीद दिन) आज चिंचवड येथे कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे कष्टकरी कामगारांच्या वतीने भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. “शहीदांनी पाहिलेला शोषणमुक्त भारताचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामगारांनी संघटित होणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,” असा सूर या प्रसंगी उमटला.
यावेळी कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.
अभिवादन करताना काशिनाथ नखाते म्हणाले की, “शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या क्रांतिकारी विचारांनी केवळ देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले नाही, तर अन्याय, शोषण आणि असमानतेविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. विशेषतः भगतसिंग यांनी श्रमिक वर्गाच्या हक्कांसाठी आणि सन्मानासाठी दिलेला लढा आजही कामगार चळवळीला ताकद देतो. कामगारांच्या हक्कासाठी उभे राहण्याची ऊर्जा आम्हाला त्यांच्या बलिदानातूनच मिळते.”
या कार्यक्रमात उपस्थितांनी कामगार, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी एकजुटीने संघर्ष करण्याचा संकल्प केला. शहीदांचे बलिदान केवळ आठवणीत न ठेवता ते आपल्या दैनंदिन कृतीतून आणि हक्कांच्या लढ्यातून जिवंत ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या अभिवादन सोहळ्याला निमंत्रक बालाजी लोखंडे, लाला राठोड, उपाध्यक्ष राजेश माने, सुनील भोसले, सीमा धंदर, अश्विनी शिंदे, सुवर्णा विधाते, सविता खिलारे, गंगा मिर्गल, दीपाली वसंतकर, सरिता पाटील, रेखा शिंदे, संगीता पोते आणि रोशन बागी यांच्यासह अनेक कष्टकरी बांधव उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।
