महावितरणचा भोंगळ कारभार नागरिकांच्या जीवावर! पिंपरी-चिंचवडमध्ये विद्युत कामांत गंभीर निष्काळजीपणा; सुहास कुदळे यांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : बालाजी नवले, २३ मार्च २०२६ | मॅक्स मंथन विशेष:
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांत महावितरणमार्फत सुरू असलेल्या विद्युत कामांमध्ये प्रचंड अनियमितता आणि सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केबल जॉईंटपासून ते खांबांवरील कामांपर्यंत कुठेही अधिकृत देखरेख नसल्याने नागरिकांच्या जिविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषी अधिकारी आणि ठेकेदारांना ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांनी महावितरणच्या अध्यक्षांकडे केली आहे.
सुहास कुदळे यांनी खराळवाडी, बिजलीनगर, सांगवी आणि हिंजवडी परिसरातील कामांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर खालील गंभीर बाबी निदर्शनास आणून दिल्या आहेत:
-
सुरक्षा साधनांचा अभाव: काम करणाऱ्या ठेकेदारांकडे आणि कामगारांकडे हेल्मेट, हातमोजे किंवा इतर कोणतीही आवश्यक सुरक्षा साधने नसतात.
-
देखरेखीचा अभाव: कामाच्या ठिकाणी महावितरणचा कोणताही अधिकृत अधिकारी उपस्थित नसतो, सर्व कामे कंत्राटी कामगारांच्या भरवशावर सोडून दिली जातात.
-
कागदोपत्री पूर्तता: काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी करण्याऐवजी केवळ कार्यालयात बसून कागदोपत्री अहवाल तयार केले जात आहेत.
-
पात्रतेवर शंका: काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे आवश्यक तांत्रिक पात्रता किंवा प्रमाणपत्रे आहेत की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
निकृष्ट दर्जाच्या केबल जॉईंट्स आणि उघड्या विद्युत तारांमुळे आगामी पावसाळ्यात शॉर्ट सर्किट किंवा शॉक लागून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक सुरक्षेचा हा प्रश्न अत्यंत गंभीर असून, माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या माहितीलाही अधिकारी गोलगोल उत्तरे देऊन टाळत असल्याचा आरोप कुदळे यांनी केला आहे.
१. पिंपरी-चिंचवडमधील सर्व सुरू असलेल्या विद्युत कामांची तातडीने स्वतंत्र चौकशी करावी.
२. नियमभंग करणाऱ्या आणि अपात्र ठेकेदारांना महापालिकेच्या धर्तीवर महावितरणनेही काळ्या यादीत टाकावे.
३. दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी.
४. भविष्यातील कामांसाठी पारदर्शक आणि कडक सुरक्षा नियमावली (SOP) लागू करावी.
“महावितरणचे अधिकारी आणि ठेकेदार केवळ स्वतःचा फायदा पाहत असून नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत. जर तातडीने सुधारणा झाली नाही आणि एखादी दुर्घटना घडली, तर त्याला सर्वस्व महावितरण प्रशासन जबाबदार असेल.”
— सुहास कुदळे, सामाजिक कार्यकर्ते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।
