भोंदूगिरी आणि बुवाबाजीला लगाम घाला! जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘अनिस’चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अमरावती, प्रतिनिधी विलास सावळे, २५ मार्च २०२६ | मॅक्स मंथन विशेष:
अमरावती : “दैवी शक्ती, चमत्कार आणि अघोरी प्रथांच्या नावाखाली लोकांची होणारी आर्थिक व मानसिक फसवणूक थांबवण्यासाठी ‘महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्या’ची जिल्ह्यात कडक अंमलबजावणी करावी,” या मागणीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (महा. अनिस) अमरावती जिल्हा व शहर शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
जिल्ह्यात वाढत्या अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) श्रद्धा शारदा बबन उदावंत यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, अलीकडच्या काळात काही भोंदू बुवा-बाबांमुळे समाजात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे शोषण आणि लोकांची लूट होण्याचे प्रकार समोर येत आहेत. यावर प्रतिबंध लावण्यासाठी ‘अनिस’ने खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
-
अंनिस कक्ष: प्रत्येक पोलीस ठाण्यात जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कक्ष प्रत्यक्ष कार्यान्वित करावा.
-
समितीची बैठक: जिल्हास्तरावरील जादूटोणाविरोधी कायदा प्रचार-प्रसार समितीची तातडीने बैठक बोलावून त्यात ‘अनिस’च्या पदाधिकाऱ्यांना सहभागी करून घ्यावे.
-
पोलीस पाटीलांची मदत: गावात कार्यरत असलेल्या संशयास्पद बुवा-बाबांची माहिती पोलीस पाटीलांच्या माध्यमातून संकलित करून त्यांचा शोध घ्यावा.
-
कठोर कारवाई: फलज्योतिष, चमत्कार किंवा दैवी शक्तीचा दावा करून फसवणूक करणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत.
भारतीय राज्यघटनेत अधोरेखित केलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि समाज पातळीवर जिल्हा प्रशासनाने जनजागृती कार्यक्रम आयोजित करावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. केवळ कायदे करून अंधश्रद्धा संपणार नाही, तर लोकांच्या विचारांत बदल घडवणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना विजय डवरे, प्रफुल्ल मंदा श्रीधर, नरेंद्र धर्माळे, रवींद्र फुले, अमर मालगे, विजय वानखडे, वर्षा गावंडे व विजया करोले हे अमरावती जिल्हा व शहर शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।

