श्रद्धेचा बाजार आणि राजकारणाची सावली; बुवाबाजीचे लोकशाहीसमोरील गंभीर आव्हान
अमरावती, प्रतिनिधी विलास सावळे, दिनांक: ३१ मार्च २०२६,मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती/पिंपरी-चिंचवड: भारतीय समाजात धर्म आणि अध्यात्माला अत्यंत पवित्र स्थान आहे. मात्र, याच श्रद्धेचा गैरफायदा घेऊन काही तथाकथित ‘बाबा’ आणि ‘गुरू’ यांनी धर्माच्या नावाखाली बुवाबाजीचा मोठा बाजार मांडला आहे. सामान्य माणसाच्या मनातील भीती आणि असुरक्षिततेचा वापर करून उभ्या राहिलेल्या या व्यवस्थेला अनेकदा राजकीय छुप्या पाठबळाची सावली मिळत असल्याचे चिंताजनक चित्र समोर येत आहे.
भारतात चंद्रास्वामींपासून ते सत्यसईबाबांपर्यंत अनेकांनी तंत्र-मंत्र आणि अलौकिक शक्तींच्या दाव्यांमुळे मोठा भक्तवर्ग निर्माण केला. या प्रभावामुळे अनेक राजकीय नेते आणि उद्योगपती त्यांच्याशी जोडले गेले. नुकतेच नाशिकमधील अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर, धर्म, बुवाबाजी आणि राजकारण यांच्यातील हे धोकादायक साटेलोटे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. कौटुंबिक अडचणीत असलेल्या लोकांना जाळ्यात ओढून त्यांचे आर्थिक आणि लैंगिक शोषण करणे, हा एक ठराविक ‘पॅटर्न’ अशा घटनांमध्ये दिसून येतो.
या संपूर्ण व्यवस्थेत सर्वात जास्त भरडल्या जातात त्या महिला. संकटातून मार्ग काढण्यासाठी या बुवांकडे गेलेल्या स्त्रियांना कधी औषध देऊन, तर कधी ब्लॅकमेल करून किंवा कुटुंबाची भीती दाखवून त्यांचे शोषण केले जाते. सामाजिक बदनामीच्या भीतीने अनेक महिला तक्रार करण्यास पुढे येत नाहीत, ज्याचा फायदा हे भोंदू बाबा घेत राहतात.
भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावाद विकसित करण्याचे कर्तव्य सांगते. मात्र, आजही समाजात आणि राजकारणात मांत्रिक, ज्योतिषी आणि बुवांचा वाढता प्रभाव ही मोठी विसंगती आहे. “श्रद्धा जेव्हा विवेकशून्य बनते आणि सत्तेच्या सावलीत येते, तेव्हा ती शोषणाचे साधन बनते,” असे मत सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवला आहे. बुवा-बाबांच्या छायेतून बाहेर पडून वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित प्रगतशील राजकारण उभे करणे ही काळाची गरज आहे. समाजाने जागरूक राहून श्रद्धा आणि विवेक यांचा समतोल राखला नाही, तर हा श्रद्धेचा बाजार लोकशाहीसाठी मोठे आव्हान ठरू शकतो.
“राजकारण्यांनी बुवा-बाबांच्या प्रभावातून मुक्त होऊन लोकांच्या खऱ्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. श्रद्धेच्या नावाखाली होणारे शोषण थांबवण्यासाठी समाजाने वैज्ञानिक विचारांचा स्वीकार करायला हवा.”
— प्रफुल्ल मंदा श्रीधर, जिल्हाकार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अमरावती.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
