news
Home पिंपरी चिंचवड ‘विचार प्रबोधन पर्व २०२६’ चा भीमसृष्टी येथे दिमाखदार प्रारंभ; शाहिरीतून रंगला महापुरुषांच्या विचारांचा जागर

‘विचार प्रबोधन पर्व २०२६’ चा भीमसृष्टी येथे दिमाखदार प्रारंभ; शाहिरीतून रंगला महापुरुषांच्या विचारांचा जागर

शारदा मुंडे यांचा एकपात्री प्रयोग आणि 'तृतीय रत्न' नाटकाने वेधले पिंपरीकरांचे लक्ष; समता सप्ताहात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

भविष्यातही समाजप्रबोधनाचे हे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवणार – शाहीर राजेंद्र कांबळे

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी मनोज प्रधान , १२ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “गेल्या चार दशकांहून अधिक काळ मी शाहिरीच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करत आहे. महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार करणे ही केवळ कला नसून ती माझी सामाजिक जबाबदारी आहे. या कलेची दखल घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलेला हा सन्मान मला भविष्यात अधिक जोमाने कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे,” असे उद्गार प्रज्ञावंत शाहीर राजेंद्र कांबळे यांनी काढले.

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘सामाजिक समता सप्ताह व विचार प्रबोधन पर्व २०२६’ चा आज पिंपरी येथील भीमसृष्टी येथे उत्साहात प्रारंभ झाला. याप्रसंगी शाहीर राजेंद्र कांबळे यांना महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे आणि विविध समित्यांचे सभापती व नगरसदस्य उपस्थित होते. मानपत्राचे वाचन विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी केले.

शाहीर राजेंद्र कांबळे यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या ओजस्वी वाणीतून शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा पोवाडा पोहोचवला आहे. त्यांच्या या निस्पृह योगदानाबद्दल महापौरांनी त्यांचे कौतुक केले. शाहिरी ही केवळ करमणूक नसून ते समाज परिवर्तनाचे शस्त्र आहे, हे कांबळे यांनी आपल्या सादरीकरणातून पुन्हा एकदा सिद्ध केले.

प्रबोधन पर्वाच्या पहिल्याच दिवशी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी नागरिकांची मने जिंकली:

  • ‘मी जोतीबाची सावित्री’: शारदा मुंडे यांच्या एकपात्री प्रयोगातून सावित्रीबाईंचा संघर्षमय प्रवास उलगडला.

  • शाहिरी जलसा: शाहीर राजेंद्र कांबळे यांनी आपल्या खड्या आवाजात परिवर्तनाचे संदेश दिले.

  • गीत गायन: साधना मेश्राम व मंजुषा शिंदे यांनी सामाजिक जाणीव जागृत करणाऱ्या गीतांची मैफिल सजवली.

  • ‘तृतीय रत्न’ नाटक: थिएटर वर्कशॉप कंपनीने महात्मा फुले लिखित या अजरामर नाटकाद्वारे अंधश्रद्धेवर प्रहार केला.

  • काव्यमैफिल: ‘काव्यभूमी’ संस्थेच्या वतीने ‘गाथा साऊ जोतीची’ या उपक्रमातून महापुरुषांच्या कार्याला काव्यांजली अर्पण करण्यात आली.

या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून विचारांच्या या महाकुंभाला दाद दिली. जनतेला महापुरुषांच्या विचारांची शिदोरी देण्याचा महापालिकेचा हा प्रयत्न यशस्वी ठरताना दिसत आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!