‘बालनगरी’त सुरक्षा धोक्यात; रक्षक अनुपस्थितीवरून महापालिकेकडे तक्रार
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, २२ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
भोसरी: भोसरी येथील गवळीमाथा (इंद्रायणीनगर) परिसरातील प्रसिद्ध ‘बालनगरी’ प्रकल्पात सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सुरक्षा रक्षकांच्या सततच्या अनुपस्थितीमुळे येथील लाखो रुपयांच्या मालमत्तेची सुरक्षा धोक्यात आली असून, याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
‘बालनगरी’ हा प्रकल्प मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. येथे विविध शासकीय व सार्वजनिक कार्यालयांच्या प्रतिकृती असून त्याद्वारे मुलांना प्रशासकीय कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव दिला जातो. मात्र, अशा संवेदनशील ठिकाणीच सुरक्षेचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
तक्रारदारांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बालनगरी प्रकल्पासाठी सुरक्षा रक्षक नियुक्त केलेले असतानाही ते कर्तव्यावर अनेकदा हजर नसतात. रक्षक नसल्यामुळे परिसरातील मौल्यवान शैक्षणिक साहित्य आणि इतर मालमत्ता चोरीला जाण्याची किंवा त्यांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. या निष्काळजीपणामुळे संबंधित कंत्राटदार आणि एजन्सीच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
-
सुरक्षा रक्षकांची दररोजची उपस्थिती सुनिश्चित करावी.
-
कर्तव्यात कसूर करणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करावी.
-
संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
-
संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करावी.
शहरातील मुलांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या या प्रकल्पाची दुरावस्था होऊ नये, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. आता या गंभीर तक्रारीवर महानगरपालिका प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


