“महाराष्ट्राने आपल्याला रडायचे नाही, तर लढायचे शिकवले आहे!”; ‘सावित्रीबाई फुले’ मालिकेच्या यशासाठी शिर्डीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे राहाता येथे फुलेप्रेमींना जाहीर आवाहन; शेतकरी व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
राहाता , अहिल्यानगर प्रतिनिधी , ७ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
राहाता , अहिल्यानगर: “महाराष्ट्राने आपल्याला रडायचे नाही, तर लढायचे शिकवले आहे. कारण काहीही असो, आपण आपली रेघ मोठी करत पुढे जाऊ आणि ‘सावित्रीबाई फुले’ मालिका यशस्वी करू,” असा ठाम विश्वास शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे. राहाता येथील श्रीसंत सावता महाराज मंगल कार्यालयात आयोजित फुलेप्रेमींच्या भव्य मेळाव्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या मेळाव्यास परिसरातील शेतकरी बांधव, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या सडेतोड भाषणात खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, महाराष्ट्र ही शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या विचारांची भूमी असून या भूमीला संतांचा समृद्ध वारसा लाभला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता संघर्ष करण्याची प्रेरणा आपल्याला येथूनच मिळते.
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सावित्रीबाई फुले’ मालिकेबाबत सध्या टीआरपीचे (TRP) कारण पुढे केले जात असले, तरी आपण निराश न होता एकजुटीने या मालिकेला पाठिंबा दिला पाहिजे. ही मालिका केवळ केवळ मनोरंजन नसून महाराष्ट्राच्या सामाजिक क्रांतीच्या इतिहासाची आणि विचारपरंपरेची खरी ओळख आहे. त्यामुळे प्रत्येकाने ही मालिका स्वतः पाहावी, आपल्या कुटुंबाला दाखवावी आणि समाजप्रबोधनाचे हे कार्य पुढे नेण्यासाठी इतरांनाही प्रेरित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी प्रमुख उपस्थिती असलेले रविकाका बोरावके यांनी कोपरगाव, शिर्डी आणि राहाता या संपूर्ण परिसरातून या चळवळीला व मालिकेला पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही दिली. उद्योजक किशोर बोरावके यांनी मान्यवर पाहुण्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. धनुभाऊ गाडेकर आणि नगराध्यक्ष स्वाधीन गाडेकर यांनी उपस्थित सर्व फुलेप्रेमींचे स्वागत करत आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला. सौ. जेजुरकर यांनी महिला वर्गाच्या वतीने ‘सावित्रीच्या लेकी’ या मालिकेच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत, असा विश्वास दिला. वाकडी गावच्या सरपंच सौ. आहेर यांनीही पाहुण्यांचा सत्कार करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ‘सावित्री शक्तिपीठ, पुणे’चे अध्यक्ष दशरथ कुळधरण यांनी सांगितले की, महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य जागतिक स्तरावर प्रेरणादायी आहे. हा वारसा भावी पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ही मालिका घरघरात पोहोचणे गरजेचे आहे. त्यानंतर ‘सावित्री शक्तिपीठा’च्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. सुनीता शिंदे यांनी उपस्थित शेकडो नागरिकांना फुले दांपत्याच्या विचारांसाठी आणि या सामाजिक कार्यासाठी समर्पित होण्याची जाहीर शपथ दिली.
या भव्य मेळाव्यासाठी संभाजीनगरहून आलेले संपतराव शिंदे, कांचन गादीकर, सत्यशोधक जयकुमार चर्जन, शीला चर्जन, टिळेकर, किशोर बोरावके यांच्यासह परिसरातील अनेक सामाजिक, राजकीय क्षेत्रांतील मान्यवर, ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्याच्या शेवटी शीला चर्जन (सावित्री शक्तिपीठ) यांनी तमाम महाराष्ट्रवासीयांना खालील आवाहन केले आहे. १. ‘मराठी वारसा’ (Marathi Warasa) हे अधिकृत यूट्यूब चॅनेल सर्वांनी सबस्क्राइब करावे. २. ‘सावित्रीबाई फुले’ मालिका स्वतः पाहा आणि आपल्या कुटुंबीय, मित्र व नातेवाईकांनाही पाहण्यासाठी प्रोत्साहित करा. ३. मालिका पाहून आपली सकारात्मक प्रतिक्रिया वाहिनीपर्यंत अवश्य नोंदवा. ४. ज्यांना शक्य असेल त्यांनी विचारपरंपरेच्या या कार्यासाठी सढळ हाताने आर्थिक सहकार्य करावे आणि फुले दांपत्यांच्या विचारांच्या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


