रहाटणीत मुसळधार पावसामुळे पवना नदीला पूर; सखल भागांतील वस्त्यांमध्ये शिरले पाणी! आपत्कालीन पथकाच्या साहाय्याने नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर; स्थायी समिती सदस्य बाबासाहेब त्रिभुवन स्वतः मदतीसाठी मैदानात
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ७ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून नदीला मोठा पूर आला आहे. या पूरपरिस्थितीचा फटका रहाटणी परिसरातील नदीकाठच्या व सखल भागांना बसला असून अनेक वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या गंभीर परिस्थितीत स्थानिक माजी नगरसेवक तथा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य श्री. बाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन यांनी स्वतः सकाळी ८ वाजल्यापासून पूरग्रस्त भागात उपस्थित राहून, महापालिका प्रशासनाच्या सोबतीने नागरिकांच्या बचाव व मदतकार्याची धुरा सांभाळली.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पवना नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्यामुळे रहाटणी प्रभागातील रहाटणी गावठाण, पवनानगर, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर, भैरवनाथ मंदिर, हनुमान मंदिर आणि गंगानगर परिसरातील अनेक निवासी वस्त्यांमध्ये पुराचे पाणी वेगाने शिरले. घरांमध्ये आणि सोसायट्यांमध्ये पाणी साचल्यामुळे स्थानिक नागरिकांसमोर मोठे संकट उभे राहिले होते.
परिस्थितीची भिषणता लक्षात घेऊन स्थायी समिती सदस्य बाबासाहेब त्रिभुवन यांनी तात्काळ पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अग्निशामक दल (Fire Brigade) आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या (Disaster Management) पथकाला पाचारण केले. सोमवार सकाळी ८ वाजल्यापासूनच प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्याने पूरग्रस्त भागातील नागरिकांचे बोटी आणि सुरक्षा साधनांच्या मदतीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. या सर्व नागरिकांची राहण्याची आणि खाण्यापिण्याची तात्पुरती व्यवस्था रहाटणी येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक ५५ मध्ये करण्यात आली आहे.
या संपूर्ण बचाव आणि मदतकार्यादरम्यान स्वतः घटनास्थळी चिखलात व पाण्यात उतरून प्रशासकीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधणारे जनसेवक बाबासाहेब त्रिभुवन म्हणाले,
“पावसाचा जोर कायम असल्याने नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. आम्ही स्वतः जाग्यावर थांबून प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित स्थळी हलवत आहोत. महापालिकेच्या शाळेत त्यांच्या निवासाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. पूरग्रस्त भागातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च आणि पहिली जबाबदारी आहे. कोणत्याही आपत्कालीन आणि कठीण परिस्थितीत आम्ही जनतेच्या सेवेसाठी २४ तास मैदानावर तत्पर आहोत.”
संकटसमयी स्वतः लोकप्रतिनिधी प्रशासनाला सोबत घेऊन मदतीसाठी धावून आल्याने आणि तात्काळ निवारा उपलब्ध करून दिल्याबद्दल रहाटणी गावठाण, पवनानगर आणि गंगानगर परिसरातील समस्त रहिवाशांनी श्री. बाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन आणि महापालिकेच्या आपत्कालीन पथकाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

