रहाटणीत ३६ तासांनंतर वीजपुरवठा अखेर सुरळीत! मुसळधार पावसात स्थायी समिती सदस्य बाबासाहेब त्रिभुवन रात्री ११ वाजेपर्यंत मैदानावर; महावितरणच्या अधिकाऱ्यांशी साधला समन्वय
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान , ९ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले असतानाच, रहाटणी प्रभागातील नागरिकांना मोठ्या अंधाराचा सामना करावा लागला होता. मुसळधार पावसामुळे रहाटणी परिसरातील सिद्धिविनायक विडशीम सोसायटीसह विविध सखल व निवासी भागांतील वीजपुरवठा तब्बल ३६ तासांहून अधिक काळ खंडित झाला होता. मात्र, स्थानिक नागरिकांच्या या मोठ्या समस्येची दखल घेत स्थायी समिती सदस्य श्री. बाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट घटनास्थळावरून संपर्क साधून आणि सातत्याने पाठपुरावा करून अखेर हा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश मिळवले आहे.
अंधारात अडकलेल्या नागरिकांना तात्काळ दिलासा मिळावा, यासाठी चिंचवड विधानसभेचे आमदार मा. श्री. शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे मदतकार्य राबविण्यात आले.
वीजपुरवठा खंडित झाल्याने सिद्धिविनायक विडशीम सोसायटी आणि परिसरातील नागरिक, विशेषतः लहान मुले व वृद्ध कमालीचे त्रस्त झाले होते. समस्येचे गांभीर्य ओळखून जनसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी तात्काळ महावितरणच्या (MSEDCL) वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधला.
महावितरणचे कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता ज्ञानदेव तरंगे आणि सहायक अभियंता सुनील कदम यांच्या तांत्रिक पथकाला पाचारण करून स्वतः बाबासाहेब त्रिभुवन रात्री ११ वाजेपर्यंत प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहिले. भरपावसात आणि अंधारात महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करून घेण्यात आले. त्यांच्या या अथक आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अखेर संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला आणि रहाटणी परिसर पुन्हा एकदा प्रकाशमान झाला.
तब्बल ३६ तासांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर वीज परत आल्याने स्थानिक नागरिकांनी आणि सोसायटीतील रहिवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. संकटसमयी आणि बिकट परिस्थितीत लोकप्रतिनिधी स्वतः रात्री उशिरापर्यंत पाऊस-पाण्याची तमा न बाळगता सोबत उभा राहिल्याने रहिवाशांनी बाबासाहेब त्रिभुवन व महावितरणच्या संपूर्ण पथकाचे मनापासून आभार मानले.
याप्रसंगी बोलताना स्थायी समिती सदस्य बाबासाहेब त्रिभुवन म्हणाले,
“मुसळधार पावसामुळे तांत्रिक बिघाड होऊन वीज खंडित झाली होती. नागरिकांची गैरसोय आमच्यासाठी वेदनादायी होती. जनतेच्या प्रत्येक कठीण आणि अडचणीच्या क्षणी तत्परतेने धावून जाणे, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत अहोरात्र प्रयत्न करणे, हेच माझे मुख्य ध्येय आणि कर्तव्य आहे.”
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


