नागरिक त्रस्त, आयुक्त मात्र एसी केबिनमध्ये मस्त! महापूर ओसरल्यानंतर रोगराईचे संकट, तक्रार घेऊन गेलेल्या नागरिकांना भेटण्यासही आयुक्तांना वेळ मिळेना; पिंपरी-चिंचवडमध्ये तीव्र संताप
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , १० जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांत आणि नदीकाठच्या वस्त्यांमध्ये हाहाकार उडाला आहे. महापूर ओसरल्यानंतर आता नागरिकांसमोर जगण्याचा आणि आरोग्याचा भीषण प्रश्न निर्माण झाला असताना, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी मात्र सुरक्षित ठिकाणी बसून केवळ दैनंदिन प्रशासकीय कामात ‘व्यस्त’ आणि आपल्या एसी केबिनमध्ये ‘मस्त’ असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पूरग्रस्त भागातील गंभीर परिस्थितीची माहिती देण्यासाठी आणि आयुक्तांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना भेटण्यासही आयुक्तांनी नकार दिल्याने शहरात प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शहरातील भाट नगर, रिव्हर रोड, आंबेडकर कॉलनी, रमाबाई नगर आणि पुनर्वसन बिल्डिंग या आणि यांसारख्या अत्यंत दाट लोकवस्तीच्या परिसरात महापुराचे पाणी प्रचंड प्रमाणात शिरले होते. काही भागांत तर तब्बल ६ फुटांपर्यंत पाणी साचल्याने नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
आता पूर ओसरला असला, तरी नागरिकांच्या घरांमध्ये, अंगणात आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर चिखल व कुजलेला गाळ साचला आहे. या साचलेल्या गाळामुळे दुर्गंधी पसरली असून परिसरात मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
घरातील गाळ आणि चिखल साफ करण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, आपत्कालीन परिस्थितीतही महापालिकेकडून या भागांमध्ये पाणीपुरवठा केला जात नसल्याने नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत.
पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरातील कपडे, वस्तू, अन्न-धान्य आणि महागडे फर्निचर पूर्णपणे भिजून खराब झाले आहे. हताश झालेल्या लोकांनी हे सर्व कुजलेले साहित्य आणि कचरा घराबाहेर रस्त्यावर आणून ठेवला आहे. हा कचरा तातडीने हटवून संपूर्ण परिसर निर्जंतुक (Sanitize) करण्याची नितांत गरज असताना, महापालिकेचा आरोग्य व स्वच्छता विभाग याकडे पूर्णपणे डोळेझाक करत आहे.
या संपूर्ण भीषण परिस्थितीचे गांभीर्य महापालिका प्रशासनाच्या वेशीवर टांगण्यासाठी आणि तातडीने मदत मिळवण्यासाठी बाधित भागातील प्रतिनिधी आणि काही नागरिक महापालिकेत गेले होते. मात्र, “आयुक्त महोदय प्रशासकीय बैठकांमध्ये व्यस्त आहेत,” असे सांगत त्यांना भेटण्यासाठी वेळ देण्यास साफ नकार देण्यात आला.
शहरावर संकट आलेले असताना, स्वतः आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष मैदानावर उतरून पूरग्रस्त भागांचा दौरा करणे, मदतकार्यावर नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांना धीर देणे अपेक्षित होते. परंतु, ते शहराचा दौरा करणे जाणीवपूर्वक टाळत असून, आपल्या दालनात बसून केवळ कागदी घोडे नाचवण्यात धन्यता मानत आहेत, असा आरोप करत नागरिकांनी महापालिकेतच प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला.
“शहर पावसाने आणि गाळाने त्रस्त आहे, तर आयुक्त मात्र एसी केबिनमध्ये मस्त आहेत,” अशा तीव्र शब्दांत पूरग्रस्तांनी आपला संताप व्यक्त केला आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याऐवजी आयुक्तांना केवळ दैनंदिन प्रशासकीय कामकाज करणे महत्त्वाचे वाटत असेल, तर ही बाब अत्यंत खेदजनक आणि शहराच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत धोकादायक आहे.
अब्जावधी रुपयांचे बजेट असलेल्या या ‘स्मार्ट’ शहरात गरिबांच्या वस्त्या गाळात रुतल्या आहेत आणि पालिका प्रमुख मात्र जनतेच्या सुखा-दुःखाशी काहीही देणेघेणे नसल्यासारखे वागत आहेत. आता या तीव्र जनक्षोभानंतर तरी आयुक्तांची कुंभकर्णी झोप उडणार का आणि या पूरग्रस्त भागांना तातडीने मदत मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
