5
ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटी परिसंस्था मजबूत करण्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन!
पिंपरी/पुणे, प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान दि. ८ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे: भारतातील ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटी परिसंस्थेला अधिक सक्षम आणि डिजिटलदृष्ट्या सुरक्षित बनवण्यासाठी केंद्रीय रस्ता वाहतूक संस्था (CIRT), ऑटोसिफू प्रा. लि. आणि जगमंगल सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटी प्रिन्सिपल्स मीट २०२६” (Leadership and Institutional Engagement Meet on Automotive Cybersecurity Talent Development Ecosystem) चे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडले.
याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, “वाहनांमध्ये सॉफ्टवेअर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे सुरक्षित आणि विश्वासार्ह मोबिलिटीसाठी सायबर सिक्युरिटी हा अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ बनला आहे. ऑटोमोटिव्ह सायबर सुरक्षेचा संबंध केवळ वाहन सुरक्षेशी नसून रस्ता सुरक्षा, सार्वजनिक सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा आणि ग्राहकांच्या विश्वासाशी थेट जोडलेला आहे.”
या भव्य कार्यक्रमास सीआयआरटीचे संचालक डॉ. देवेंद्र सिंह (IAS), एमडीसी व ऑटोमोटिव्ह सायबर सुरक्षा प्रमुख फारुख मखदूम, जगमंगल सोशल फाउंडेशनच्या संस्थापक संचालक प्रिया गुजराथी, निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शहाजी सोलुंखे (IPS), ऑटोसिफू प्रा. लि.चे संचालक व सह-संस्थापक जगन्नाथ तिवारी, ऑपरेशन्स प्रमुख विक्रम पगारे, शैक्षणिक सल्लागार विद्यावाचस्पती विद्यानंद प्रा. डॉ. शैलेश कुलकर्णी, केथ इलेक्ट्रो सर्किट्सचे व्यवस्थापकीय संचालक राहुल सुलताने, बजाज ऑटोचे (R&D) उपाध्यक्ष मिलिंद पगारे, स्कोडा-फोक्सवॅगन समूहाचे तांत्रिक प्रशिक्षण तज्ज्ञ लोकेश कुमार, नॉर ब्रेम्से सिस्टिम्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष महेश शहापुरे, फिलिप जॉन (अशोक लेलँड) आणि अरुण बिष्ट उपस्थित होते.
याशिवाय डॉ. संदीप पाधारवाडकर, डॉ. मोहन वामन, डॉ. आशिष पानट, डॉ. संतोष सोनवणे, डॉ. संदीप पाचपांडे, डॉ. कीर्ती धारवाडकर यांच्यासह विविध उद्योग व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाची अधिक माहिती देताना तेजस गुजराथी यांनी सांगितले की, १५ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत बीसीए (BCA), एमसीए (MCA) आणि अभियांत्रिकी (Engineering) शाखेतील तब्बल ५०,००० विद्यार्थ्यांसाठी ऑटोमोटिव्ह सायबर सुरक्षेवर विशेष जनजागृती अभियानाचे आयोजन केले जात आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर-आधारित वाहन तंत्रज्ञान, सायबर धोके आणि करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन केले जाईल.
डॉ. देवेंद्र सिंह (IAS) यांनी स्पष्ट केले की, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील सहकार्यामुळे भविष्यातील तांत्रिक आव्हानांना सामोरे जाणारे कुशल मनुष्यबळ देशात तयार होईल. केंद्र सरकारने वाहनांसाठी सायबर सिक्युरिटी मॅनेजमेंट सिस्टम (CSMS) आणि सॉफ्टवेअर अपडेट मॅनेजमेंट सिस्टम (SUMS) नियामक चौकटीत समाविष्ट केले असून यामुळे वाहन निर्मितीत सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य मिळेल, असे फारुख मखदूम यांनी नमूद केले. आधुनिक वाहने आता केवळ यांत्रिक राहिलेली नसून ती सॉफ्टवेअर-आधारित डिजिटल प्रणाली बनली आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगशाळा व वाहन सुरक्षा चाचण्यांचा अनुभव देऊन जागतिक दर्जाचे तज्ज्ञ घडवण्याचे उद्दिष्ट या उपक्रमामागे आहे.
“भविष्यातील मोबिलिटी ही केवळ इलेक्ट्रिक किंवा कनेक्टेड वाहनांवर अवलंबून राहणार नाही, तर सुरक्षित आणि विश्वासार्ह वाहनांवर आधारित असेल,” असा ठाम संदेश या परिषदेतून देण्यात आला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
