Home पिंपरी चिंचवड टीपी स्कीम रद्द: चिखलीत आनंदोत्सव! चऱ्होलीकरांना प्रतीक्षा

टीपी स्कीम रद्द: चिखलीत आनंदोत्सव! चऱ्होलीकरांना प्रतीक्षा

भूमिपुत्रांच्या लढ्याला यश; आता चऱ्होलीतील भूमीपुत्रांच्या आशा पल्लवित

by maxmanthannews@gmail.com

पिंपरी (मॅक्स मंथन डेली न्यूज): पिंपरी चिंचवड महापालिकेने चिखली आणि कुदळवाडी भागातील प्रस्तावित टीपी स्कीम (Town Planning Scheme) रद्द केल्याने ग्रामस्थांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटून गावकऱ्यांनी आपली खुशी व्यक्त केली. भूमिपुत्रांनी या योजनेविरोधात दिलेला लढा अखेर यशस्वी झाला आहे. मात्र, याच दरम्यान चऱ्होलीतील ग्रामस्थांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महापालिकेने चिखली-कुदळवाडी भागातील हजारो एकर जमिनीवर आरक्षण टाकून विकास प्रकल्प प्रस्तावित केले होते. याला येथील भूमीपुत्रांनी कडाडून विरोध केला आणि संघर्ष करण्याचा निर्धार केला. अखेरीस प्रशासनाला त्यांच्या मागणीपुढे झुकावे लागले. नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चिखली-कुदळवाडीतील टीपी स्कीम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर ग्रामस्थांनी अक्षरशः दिवाळी साजरी केली.

या विरोधात ग्रामस्थांनी यापूर्वीच तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. ‘आमचा जीव गेला तरी बेहत्तर, पण टीपी होऊ देणार नाही,’ अशा शब्दांत त्यांनी आपला निर्धार प्रशासनाला कळवला होता. निषेधाचे प्रतीक म्हणून टीपी स्कीमच्या जाहीर प्रकटनाची होळी देखील करण्यात आली होती. ग्रामस्थांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाला माघार घ्यावी लागली.

चिखलीत दिवाळी:

टीपी स्कीम रद्द झाल्यानंतर चिखली आणि कुदळवाडीतील ग्रामस्थांनी दिवाळीसारखा उत्साह साजरा केला. संपूर्ण गावाने एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला आणि जोरदार फटाक्यांची आतषबाजी केली. ग्रामस्थांनी सांगितले की, यापूर्वीच चिखली-कुदळवाडीची जमीन पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणात गेली आहे. महापालिकेच्या आरक्षणातही मोठा भाग गेला आहे. स्वस्त घरांसाठी १०० एकर जमीन घेतली आहे आणि रस्त्यांसाठीही जमीन संपादित केली आहे. उद्योग व्यवसायासाठी जागा शिल्लक असताना अतिक्रमणाच्या नावाखाली जमिनींवर बुलडोझर फिरवण्यात आला होता. त्यामुळे टीपी स्कीमला विरोध करणे स्वाभाविक होते आणि अखेर त्यांचा लढा यशस्वी झाला.

चऱ्होलीतील ग्रामस्थांचे काय?

चिखली आणि कुदळवाडीतील ग्रामस्थांना न्याय मिळाला असला तरी, याच शहर विकास आराखड्यात चऱ्होली भागातही टीपी स्कीम लागू करण्याचा प्रस्ताव होता. चिखलीच्या ग्रामस्थांप्रमाणे चऱ्होलीतील ग्रामस्थांनीही या योजनेला विरोध केला होता. आता चिखलीतील स्कीम रद्द झाली असली तरी, चऱ्होलीबाबत महापालिका काय निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. चऱ्होलीतील ग्रामस्थांनाही असाच आनंदाचा दिवस अनुभवायला मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे असेल.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!