53
सोलापूर (मॅक्स मंथन डेली न्यूज)प्रतिनिधी पंडित गवळी: जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार जी गोरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
या बैठकीत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा आवताडे यांनी आपल्या मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा घेतला आणि अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले.

आमदार समाधान दादा आवताडे यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे:
- पिण्याच्या पाण्याची व्यवस्था: मंगळवेढा तालुक्यातील नागरिकांसाठी सुरू असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरची संख्या वाढवण्यात यावी, तसेच त्यात जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचाही समावेश करावा, जेणेकरून जनावरांना पुरेसे पाणी मिळेल.
- ट्रान्सफॉर्मरमधील भ्रष्टाचार: जिल्हा नियोजन समिती अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी अधिकारी आणि ठेकेदार संगनमत करून पैसे घेतात. यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
- मंगळवेढा टेलमधील पाणी प्रश्न: मंगळवेढा टेलसाठी १.२७ टीएमसी पाणी मंजूर असूनही प्रत्यक्षात केवळ ०.२७ टीएमसी पाणी मिळते. वरच्या तालुक्यातील शेतकरी पाणी अडवून कालवे फोडतात, त्यामुळे मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही पाणी मिळत नसल्याची तक्रार आमदारांनी मांडली आणि तातडीने पाणी देण्याची मागणी केली. पालकमंत्री ना. गोरे यांनी टेल टू टेल पाणी वाटप कलम १४४ चा वापर करून मंगळवेढ्यासाठी पाणी उपलब्ध करण्याचे आदेश दिले, तसेच म्हैसाळ पाणी वाटप योजनेअंतर्गत मंगळवेढ्यातील १९ गावांना योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था लवकर करावी, असे निर्देश दिले.
- आरटीओ दंड आकारणी: आरटीओ विभागाने स्थानिक आणि शेतकऱ्यांच्या वाहनांवर दंड आकारू नये.
- टेम्भू योजनेचे पाणी: टेंभू योजनेचे पाणी माण नदीत सोडून पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील धरणे भरावीत.
- घरकुल योजनेत वाळू: घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी ५ ब्रास मोफत वाळू उपलब्ध करावी.
- पीएम किसान निधी: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील पंढरपूर आणि मंगळवेढ्यातील सुमारे दोन हजार शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा स्तरावर प्रलंबित आहेत, ते तातडीने मंजूर करून शेतकऱ्यांना निधी मिळवून द्यावा.
- आंधळगाव पाणीपुरवठा योजना: आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे, परंतु महावितरण आणि एमजीपी यांच्या समन्वयाच्या अभावामुळे लोकांना अजूनही पाणी मिळत नाही. यात समन्वय साधण्याची गरज आहे.

पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी सर्वसामान्यांची कामे आणि जिल्ह्याचा विकास सकारात्मक दृष्टिकोनातून लवकरात लवकर मार्गी लावण्याचे निर्देश दिले.
या बैठकीला खासदार, जिल्ह्यातील आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
