पिंपरी (मॅक्स मंथन डेली न्यूज): वैष्णवी हागवणे मृत्यू प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिजाऊ ब्रिगेडने केली आहे. वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीचे वळ आढळल्याने ही केवळ आत्महत्या नसून खून असण्याची शक्यता आहे, असा दावा करत जिजाऊ ब्रिगेडने पोलिसांकडे निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
पुणे जिल्हा जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा मनिषा हेमबाडे, सचिव वृषाली साठे, उपाध्यक्षा शितल घरत आणि विभागीय अध्यक्षा सुनिता शिंदे यांनी आज पोलीस आयुक्तांना याबाबत निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणात हुंडाबळी, खून आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे यांसारखी कठोर कलमे लावून आरोपींवर गुन्हे दाखल करावेत.
जिजाऊ ब्रिगेडने वैष्णवीची जाऊ मयुरी हिच्या छळाचा मुद्दाही उपस्थित केला. मयुरीलाही सासरच्यांनी छळ करून घराबाहेर काढले असून, तिने यापूर्वीच महिला आयोग आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीकडे दुर्लक्ष करून कारवाई न करणाऱ्यांचीही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जिजाऊ ब्रिगेडने केली आहे.
आयुक्तांच्या वतीने सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांनी हे निवेदन स्वीकारले. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, आबासाहेब ढवळे, अशोक सातपुते, वैभव जाधव आणि दत्तात्रय कांगळे उपस्थित होते. जिजाऊ ब्रिगेडच्या या मागणीमुळे वैष्णवी हागवणे प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळण्याची शक्यता आहे.