पिंपरीत वडेट्टीवारांचा घणाघात! “मनुवादी सरकार ओबीसींचा विकास कसा करणार?” जातीनिहाय जनगणनेवरही शंका!
(मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी): पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित ओबीसी मेळाव्यात माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्रातील भाजप सरकारवर सडकून टीका केली. “हे सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा गांधींच्या विचारांचे नसून, आरएसएस आणि मनुवादी विचारांचे आहे. त्यामुळे ओबीसी, आदिवासी आणि मागासवर्गीयांचा विकास करणे शक्य नाही,” असा थेट आरोप त्यांनी केला.
वडेट्टीवार यांनी जातीनिहाय जनगणनेच्या घोषणेवरही शंका उपस्थित केली. ते म्हणाले, “आमचे नेते राहुल गांधी यांच्या अथक प्रयत्नांमुळे सरकारने जातीनिहाय जनगणनेची घोषणा केली. मात्र, बिहारच्या निवडणुका असल्यानेच ही घोषणा केली आहे की काय, अशी भीती मला वाटते.” त्यांनी भाजपवर जाती-जातीत भांडणे लावून आपली राजकीय पोळी भाजण्याचा आरोप केला. “निवडणुका नसत्या, तर छगन भुजबळांचा राज्याभिषेक झाला नसता,” असेही ते म्हणाले.
या मेळाव्यात बोलताना अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव पृथ्वीराज साठे यांनी आरएसएसच्या विचारधारेवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “आरएसएसच्या कुशीतून भाजप आली आहे. गोळवलकरांच्या विचारातून मनुवादी समाज रचना आणायची होती. राहुल गांधी यांनी मोदींच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिंमत दाखवली आहे.”
ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी जातीनिहाय जनगणनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “राहुल गांधींच्या पाठपुराव्यामुळे सरकारने जातीनिहाय जनगणना जाहीर केली, पण त्याची अंमलबजावणी कधी होणार? त्याची रूपरेषा कशी असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.”
काँग्रेस शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “मनपाने कुदळवाडी परिसरात रोहिंग्या, दहशतवादी आणि बांगलादेशी नागरिक राहतात, असा आरोप करून उद्योगांवर अमानुष कारवाई केली. मात्र, प्रत्यक्षात कुदळवाडीत एकही रोहिंग्या किंवा बांगलादेशी सापडला नाही. चिखलीतील ३६ बंगले पाडले, मग बांधकामांना परवानगी कशी दिली?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
वडेट्टीवार यांनी राज्यातील तीन पक्षांच्या सरकारवरही जोरदार टीका केली. “हे सरकार केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे. या सरकारमध्ये प्रचंड लूट सुरू आहे. मुंबईतील मोक्याच्या जागा उद्योगपती अदानी यांच्या घशात घातल्या जात आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
या मेळाव्यात ओबीसी सेलचे शहराध्यक्ष सोमनाथ शेळके यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी आमदार दीप्ती चौधरी, प्रदेश सरचिटणीस बाबू नायर, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णूपंत नेवाळे, डॉ. मनीषा गरुड, गौतम आरकडे, मनोज कांबळे, भरत वाल्हेकर, नरेंद्र बनसोडे, छाया शेळके, अमोल कदम, प्रवीण जांभळे, अनिता धर्माधिकारी, राणी कोरडे, जमादार हुसेन, आलम शेख आदी मान्यवर उपस्थित होते. राहुल शिंपले यांनी सूत्रसंचालन केले, तर मुजावर मोहम्मद यांनी आभार मानले.
या मेळाव्याने पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण ढवळून काढले असून, आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी आणि मागासवर्गीय मतांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.