पिंपरी (मॅक्स मंथन डेली न्यूज): हुंडाबळी आणि महिला छळ – सामाजिक दृष्टिकोन! उषामाई कांबळे यांचे परखड मत.
पिंपरीतील शिवशाही व्यापारी संघ उपनेत्या सौ. उषामाई कांबळे यांनी हुंडाबळी आणि महिला छळाच्या वाढत्या घटनांवर परखड मत व्यक्त केले आहे. “आई-वडिलांना वाटते की आपली मुलगी सासरी सुखाने नांदावी, म्हणून ते अवाजवी आहेर देतात. मात्र, सासरचे लोक भिकाऱ्यांसारखे वाट बघतात आणि आहेरावरून सुनेला मान द्यायचा की छळ करायचा, हे ठरवतात,” असे त्यांनी म्हटले आहे.
उषामाई कांबळे यांच्या मते, आहेर दिसल्यावर सासरच्या लोकांच्या मागण्या वाढतात आणि त्या पूर्ण न झाल्यास सुनेचा छळ सुरू होतो. माहेरचे लोक मुलीच्या सुखासाठी मागण्या पूर्ण करतात, पण शेवटी निष्पाप मुलीचा जीव जातो.
“आपण आजही प्रथेच्या आड कित्येक मुलींचा बळी देतो,” असे खंत व्यक्त करत त्यांनी काही सासरच्या लोकांच्या चांगल्या वागणुकीचाही उल्लेख केला. काही सुना हुंड्यासाठी स्वतःहून मागण्या करतात, तर काही मुली सासरचे श्रीमंत भिकारी असल्याचे समजल्यावर माहेरहून काहीही आणत नाहीत.
“मुलींनो, तुम्हाला लढता आले पाहिजे. परिस्थिती कधी बदलेल, हे सांगता येत नाही. माहेरचे कायम सांभाळतीलच, असे नाही. त्यामुळे खंबीर व्हा,” असे आवाहन उषामाई कांबळे यांनी केले आहे. सोशल मीडिया छळ झालेल्या मुलींसाठी मदतीचा मोठा आधार बनू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
“काही माहेरचे मुलींचे तोंडही पाहत नाहीत, काही सैराट घडवतात, तर काही आयुष्यभर सांभाळतात. मात्र, टोमणे चालूच असतात. काही मुली माहेरचा आधार बनतात, तर काही माहेरचे मुलींचा आधार बनतात,” असे उषामाई कांबळे यांनी सांगितले.
“आयुष्य खडतर आहे, मुलींनो खंबीर व्हा. छळ झालेल्या सुनांचा आवाज शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली उठवला पाहिजे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.