हुंडाबळीची शिकार पिंपरीतही! लग्नात गाडी, सोने देऊनही विवाहितेचा छळ!
राज्य महिला आयोग आणि पोलिसांनीही दखल घेतली नाही; पीडितेची व्यथा. (मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी-चिंचवड)
पिंपरी, दि. ०२ जून, २०२५ : पुण्यात उच्चभू कुटुंबातील वैष्णवी हगवणे हिच्या हुंडाबळी किंवा आत्महत्येचे प्रकरण ताजे असतानाच, पिंपरी-चिंचवडच्या आयटी हब असलेल्या हिंजवडीमध्येही हुंड्यासाठी विवाहितेचा छळ होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नात चारचाकी गाडी, १५ तोळे सोने आणि इतर महागड्या वस्तू देऊनही सासरच्या लोकांनी विवाहितेला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. याबाबत राज्य महिला आयोग आणि पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार करूनही अद्याप दखल घेतली गेली नसल्याचा आरोप पीडित ऐश्वर्या आदित्य हुलावळे यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी ऐश्वर्या यांचे आईवडीलही उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना ऐश्वर्या हलावळे (माहेरचे नाव ऐश्वर्या बबन गव्हाणे) यांनी सांगितले की, त्यांचा विवाह २८ फेब्रुवारी २०१७ रोजी आदित्य अरुण हुलावळे यांच्याशी आळंदी रोड, भोसरी येथील मयुरी पॅलेसमध्ये मोठ्या थाटामाटात झाला होता. लग्नात त्यांच्या वडिलांनी सासरच्या मागणीनुसार चारचाकी गाडी (सासूच्या नावावर), १५ तोळे सोने आणि इतर सर्व सुखसोयीच्या वस्तू दिल्या होत्या. त्यांचे वडील ८१ टक्के दिव्यांग असूनही त्यांनी मुलीच्या सुखासाठी कोणतीही कसर ठेवली नव्हती.
ऐश्वर्या यांनी पुढे सांगितले की, लग्नानंतर काही दिवसांतच पती आदित्य, सासू, दीर, आजोबा, मावस सासू आणि मावस सासरे यांनी त्यांचा छळ सुरू केला. लग्नाच्या तीन महिन्यांनंतर पतीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचे कळल्यावर सासरच्या लोकांनी पतीला समजवण्याऐवजी ऐश्वर्याला मारहाण आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच, “माहेरून पाच लाख रुपये घेऊन आल्यास नांदवू, अन्यथा घरातून निघून जा,” अशी धमकी वारंवार दिली जात होती. एका रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांना मारहाण करून घराबाहेर काढण्याची धमकी देण्यात आली.
सततच्या अत्याचार आणि धमक्यांमुळे अखेरीस ऐश्वर्या यांनी डिसेंबर २०१७ मध्ये हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावेळी पोलीस ठाण्यातही सासरच्या लोकांनी ‘तू जर तक्रार दाखल केली, तर आम्ही तुला नांदवणार नाही’, अशी धमकी दिली. त्यानंतर ५ जानेवारी आणि १५ जानेवारी २०१८ रोजी पुन्हा पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार अर्ज दिला, जिथे दोन्ही कुटुंबांना समेट घडवण्यासाठी बोलावण्यात आले, परंतु प्रकरण मिटले नाही. ३ मार्च २०१८ रोजी पुन्हा हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला, मात्र पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. खूप प्रयत्नांनंतर २४ डिसेंबर २०१८ रोजी हिंजवडी पोलिसांनी एफआयआर नोंदवला.
गुन्हा दाखल झाल्यावर ३ जानेवारी २०१९ रोजी ऐश्वर्या माहेरी गेल्या. ५ जानेवारी रोजी वकिलांकडून नोटीस पाठवण्यात आली, ज्याला त्यांनी दोघांकडून हमीपत्र लिहून घेतल्यास नांदण्यास तयार असल्याचे उत्तर दिले. त्यानंतर सप्टेंबर २०१८ मध्ये पतीकडून घटस्फोटाचे पत्र आले.
कोरोना लॉकडाऊनच्या काळात परिस्थिती काहीशी शांत होती, पण २०२२ च्या सुरुवातीपासून हुलावळे कुटुंबाकडून पुन्हा तक्रार मागे घेण्यासाठी धमक्या देण्यास सुरुवात झाली, ज्याबद्दल ऐश्वर्या यांनी पुन्हा तक्रार दाखल केली.
ऐश्वर्या यांनी असाही आरोप केला की, त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्याकडे मार्च २०२५ मध्ये तक्रार अर्ज केला, परंतु त्यांनीही दखल घेतली नाही. पोलीस प्रशासनही मदत करत नसल्याचा आरोप त्यांनी केला, ज्यामुळे महिलांवरील अत्याचार आणि त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यांनी मागणी केली की, त्यांच्यावर होणाऱ्या हुंडा आणि शारीरिक व आर्थिक छळासाठी दोषींवर कारवाई करून त्यांना न्याय मिळवून द्यावा.
या प्रकरणी हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वि. कलम 498 (अ), 406, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल आहे.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.