दिव्यांग लाभार्थ्यांनो लक्ष द्या! वाढीव अनुदानासाठी ‘हयातीचे प्रमाणपत्र’ अनिवार्य; जानेवारीअखेरपर्यंत मुदत
अमरावती, २३ जानेवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती : केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग बांधवांच्या अनुदानात १ हजार रुपयांची वाढ करण्यात आली असून, आता एकूण २ हजार ५०० रुपये अनुदान थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT) दिले जात आहे. मात्र, ज्या लाभार्थ्यांना अद्याप हे वाढीव अनुदान मिळालेले नाही, त्यांनी तातडीने आपले ‘हयातीचे प्रमाणपत्र’ (Life Certificate) काढून पोर्टलवर अपडेट करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी केले आहे.
शासनाच्या नवीन निर्णयानुसार, दिव्यांग लाभार्थ्यांचे ऑनलाईन यूडीआयडी (UDID) कार्ड पोर्टलवर अपडेट असणे अनिवार्य आहे. ज्यांना वाढीव रक्कम मिळाली नाही, त्यांनी खालील कागदपत्रे तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना शाखेत जमा करावीत:
-
यूडीआयडी (UDID) कार्ड.
-
आधार कार्ड.
-
आधार लिंक असलेल्या बँक पासबुकची प्रत.
योजनेचा लाभ खंडित होऊ नये यासाठी शासनाने ‘आधार आधारित जीवन प्रमाणपत्र प्रणाली’ विकसित केली आहे.
१. मोबाईल ॲप: लाभार्थी आपल्या अँड्रॉइड मोबाईलमधील ॲपद्वारे विनामूल्य ‘डिजीटल लाईफ सर्टिफिकेट’ जनरेट करू शकतात.
२. तहसील कार्यालय: तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभागातही ऑनलाईन हयातीचे प्रमाणपत्र काढून देण्याची सोय उपलब्ध आहे.
हे प्रमाणपत्र आपोआप NSAP पोर्टलवर अपडेट होणार आहे.
केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, वीर पत्नी व दिव्यांग योजनांच्या सर्व लाभार्थ्यांनी जानेवारी २०२६ पर्यंत आपले हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करावे. हयातीच्या प्रमाणपत्राअभावी शासनाकडून मिळणाऱ्या लाभामध्ये तांत्रिक अडचणी येऊ शकतात, त्यामुळे ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.




