दिव्यांग बांधवांसाठी खुशखबर! मानधनात १००० रुपयांची वाढ; दरमहा मिळणार २५०० रुपये, पण ‘हे’ काम करणे अनिवार्य
अमरावती, १२ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती : राज्यातील दिव्यांग बांधवांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून, त्यांच्या मासिक मानधनात (अनुदान) १,००० रुपयांची घसघशीत वाढ केली आहे. या निर्णयामुळे आता लाभार्थ्यांना दरमहा २,५०० रुपये इतके अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. मात्र, हा वाढीव लाभ मिळवण्यासाठी प्रशासनाने एक महत्त्वाची अट घातली आहे.
अमरावती जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांचे ‘युडीआयडी’ (UDID) कार्ड अद्याप आधारशी लिंक नसल्याचे समोर आल्याने प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील आकडेवारीनुसार, संजय गांधी निराधार योजनेतील २१ हजार ३५९ आणि श्रावणबाळ योजनेतील १ हजार ९१३ अशा एकूण २३ हजार २७२ दिव्यांग लाभार्थ्यांचे युडीआयडी कार्ड अद्याप आधारशी संलग्न झालेले नाही. ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास हे लाभार्थी वाढीव अनुदानापासून वंचित राहू शकतात.
वाढीव मानधनाचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी खालील प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे:
-
कागदपत्रे जमा करा: आपले ऑनलाईन युडीआयडी कार्ड, आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स संबंधित गावातील तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभागात जमा करावी.
-
ई-केवायसी (e-KYC): लाभार्थ्यांनी स्वतःहून युडीआयडी पोर्टलवर जाऊन आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.
-
मुदत: ही सर्व प्रक्रिया २० मार्च २०२६ पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे.
“कोणताही दिव्यांग लाभार्थी या वाढीव लाभापासून वंचित राहू नये, हा आमचा मुख्य उद्देश आहे. विहित मुदतीत कागदपत्रे अपडेट न केल्यास अनुदानामध्ये तांत्रिक अडचणी येऊ शकतात,” असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।
