पुण्यातील खरा ‘माईल स्टोन’: महात्मा फुले वाडा!
मराठीतील सामाजिक क्रांतीचा आधारवड आणि प्रेरणास्थान
परतवाडा (अमरावती): जयकुमार चर्जन, १४ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
‘ पुणे तेथे काय उणे ‘ असे पुणे शहराच्या बाबतीत म्हटले जाते. याच पुण्यातील ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या स्थळांना बघण्यासाठी मी मोटर सायकलने फिरत होतो. माझे सोबत सावित्री शक्तीपीठ, पुणेचे संस्थापक अध्यक्ष श्री. दशरथजी कुळधरण होते. सहज फिरता फिरता पुण्याच्या जनरल पोस्ट ऑफिसजवळ आम्ही पाणी पिण्यासाठी थांबलो असताना, माझी नजर रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका दगडावर गेली. तो ‘ शून्य मैल दगड ‘ होता. याच दगडासमोर एका स्मृतिशिळेवर कोरलेल्या ओळींनी माझे लक्ष वेधले: “आज आपल्याला माहीत असलेल्या भारताचे मोजमाप करण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्या सर्व्हेअर्सच्या प्रिय स्मृतींत.” हे वाक्य मनाला स्पर्शून गेले.
त्या स्मृतिशिळेवर आणखी एक वाक्य होते, “तुमच्या पूर्वजांची स्मृतिचिन्हे पुसून टाकू नका.” आज अशी काही मोजकीच स्मृतिचिन्हे शिल्लक आहेत. त्यांच्या नावात ‘शून्य’ असले तरी ती अमूल्य आहेत, कारण ती त्यागाची आणि भव्य स्वप्नांची कहाणी सांगतात. याच पुण्यातील असा खरा मैलाचा दगड म्हणजेच ‘महात्मा फुले वाडा.’ प्रत्येक पुणे भेटीत मी फुले वाड्याचे दर्शन घेतो. फुले आणि सावित्रीमाईंच्या वास्तव्याचा स्पर्श आणि गंध मला या वाड्यात जाणवतो. माझ्यासाठी हे एक ऊर्जा केंद्र आहे.

‘मैलाचा दगड’ म्हणजे काय?
‘मैलाचा दगड’ (माईलस्टोन) या शब्दाचा लाक्षणिक अर्थ एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील किंवा एखाद्या राष्ट्राच्या प्रगतीतील महत्त्वाचा टप्पा दर्शवतो. हा शब्द ‘यशाचे परमोच्च शिखर’ या अर्थाने घ्यावयाचा आहे. आपण केलेल्या प्रयत्नांना यश मिळून जेव्हा समाधानाचे शिखर गाठले जाते, तेव्हा त्या स्थितीस ‘मैलाचा दगड’ असे म्हणतात.
१९ व्या शतकापासून पुण्याच्या गंजपेठेत उभा असलेला ‘महात्मा फुले वाडा’ हे असाच एक ‘मैलाचा दगड’ असलेले स्मृतिस्थळ आहे. महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीचे आद्य प्रवर्तक, महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे हे निवासस्थान आहे. गेली तीन शतके हे स्मृतिस्थळ कोट्यवधी भारतीयांच्या मनात रुंजी घालत उभे आहे. हा वाडा भारतीय सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक चळवळींसाठी ‘मैलाचा दगड’ ठरला आहे.

वाड्याची ऐतिहासिक रचना आणि महत्त्व
इ.स. १८५२ च्या सुमारास बांधण्यात आलेल्या या वाड्याला १९७२ साली ‘राज्य संरक्षित वारसा स्थळ’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेनेही त्याला प्रथम श्रेणी ऐतिहासिक वास्तू म्हणून प्रमाणित केले आहे. स्वारगेटच्या जवळ असलेल्या या वाड्याला पारंपरिक हवेली पद्धतीचे स्वरूप असून, अंगणात महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांचा संयुक्त अर्धपुतळा इतिहासाची साक्ष देत उभा आहे. या पुतळ्याच्या सभोवतीच्या भिंतींवर फुले दाम्पत्यांच्या क्रांतिकारी जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांची शिल्पे आहेत.
वाड्याच्या आतमध्ये एक छोटीशी विहीर असून, इ.स. १८६८ मध्ये दुष्काळात महात्मा फुले दाम्पत्यांनी ती अस्पृश्य व मागासवर्गीय लोकांसाठी खुली केली होती. त्यामुळे तत्कालीन सनातनी समाजाने त्यांना ‘बहिष्कृत’ केले होते. या वाड्यातच सावित्रीमाईंच्या स्वयंपाकघरात महात्मा फुले यांचे संपूर्ण जीवन चित्रांद्वारे प्रदर्शित करण्यात आले आहे.

महात्मा फुले यांची समाधी आणि अखेरचा प्रवास
वाड्याच्या मुख्य दरवाजाजवळच महात्मा फुले यांची समाधी असून, त्यावर तुळशी वृंदावन आहे. याच वाड्यात २८ नोव्हेंबर १८९० रोजी महात्मा फुले यांचे निधन झाले. त्यांनी आपल्या मृत्युपत्रात देहदहनाऐवजी दफन करण्याची अंतिम इच्छा व्यक्त केली होती. परंतु पुणे नगरपालिकेने परवानगी नाकारल्यामुळे नाइलाजाने त्यांच्या पार्थिवावर दहन संस्कार करावे लागले आणि सावित्रीमाईंनी स्वतः त्यांना अग्नी दिला. त्यानंतर ३० नोव्हेंबर १८९० रोजी त्यांनी अस्थी आणून सध्याच्या समाधीच्या जागेत ठेवल्याची नोंद आहे.
हा वाडा १९२२ मध्ये श्री बाळा रखमाजी कोरे यांनी विकत घेतला होता आणि १९६९ पासून त्याचे ‘महात्मा फुले वसतिगृह’ असे नामकरण झाले. आज हा वाडा भारतातील स्त्रियांच्या शिक्षणाचे आद्यप्रवर्तक असलेल्या फुले दाम्पत्यांचे राष्ट्रीय स्मारक बनले आहे. या वाड्यासमोर आलेला प्रत्येकजण श्रद्धापूर्वक नतमस्तक होतो. कारण हाच या वाड्याचा खरा महिमा आहे.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
