67
मराठवाडा जनविकास संघाकडून पूरग्रस्तांना मोठी मदत! – १०००
कुटुंबांना धान्य किटचे वाटप
‘सेवा हीच ईश्वर पूजा’ या भावनेतून कार्य; आता विद्यार्थ्यांसाठी ‘शालेय साहित्य’ संकलनाचा नवा संकल्प
पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. १७ ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज : मराठवाडा जनविकास संघ (महाराष्ट्र राज्य) आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यातील पूरग्रस्त भागांमध्ये ‘सेवा हीच ईश्वर पूजा’ या भावनेतून मोठी मदत मोहीम राबवण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्त १००० (एक हजार) कुटुंबांना थेट गावागावात जाऊन अत्यावश्यक साहित्य आणि धान्य किटचे वाटप करण्यात आले. तहसीलदार निलेश काकडे, नायब तहसीलदार पांडुरंग मांडेकर, प्रकाश इंगोले, शाहूराज कदेरे, युवराज माने, संजय माने, गोकुळ शितोळे संतोष भोरे, गणेश गंगाविठ्ठल, विवेक पाटील, सुशांत क्षीरसागर, अशोक भोरे, शंकर तांबे, संतोष तांबे, मनोज मोरे, चंद्रकांत मोरे, सतिश मुरकुटे, तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत किट वाटप करण्यात आले. संघाकडून बीड आणि धाराशिव जिल्ह्यांतील पूरग्रस्त गावांमध्ये मदत पोहोचवण्यात आली:
-
बीड जिल्हा: शिरूर कासार तालुक्यातील कोळवाडी, ब्रम्हनाथ बोरगाव, गात शिरापूर येथे वाटप झाले.
-
धाराशिव जिल्हा: भूम व परंडा तालुक्यांमध्ये किट वाटप करण्यात आले.
या किटमध्ये तांदूळ, डाळी, बेसन, तेल, साखर, मीठ, मिरची पावडर यांसारख्या धान्यासोबतच ब्लँकेट, चटई, साडी, टॉवेल आणि प्रातिनिधिक स्वरूपात शालेय साहित्याचा समावेश होता. या वाटप कार्यक्रमाला तहसीलदार निलेश काकडे, नायब तहसीलदार पांडुरंग मांडेकर, प्रकाश इंगोले यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी व स्थानिक मान्यवर उपस्थित होते.
‘मन आणि बुद्धी पोसली पाहिजे’ – नवा संकल्प –पूरग्रस्त भागात अन्नधान्य आणि कपडे मिळाल्याने जगण्याचा आधार मिळाला असला तरी, आता शालेय साहित्याची तीव्र गरज जाणवत आहे. पूर ओसरल्यावर विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबायला नको, या विचारातून मराठवाडा जनविकास संघाने आता ‘मन आणि बुद्धी पोसली पाहिजे’ या उद्देशाने शालेय साहित्य संकलनाचा नवा संकल्प केला आहे.
-
मदतीचे आवाहन: अरुण पवार यांनी विविध देवस्थाने, प्रार्थनास्थळे आणि मंदिर ट्रस्टला या कार्यात सक्रिय होण्याची विनंती केली आहे.
-
पुढील टप्पा: येत्या ५ (पाच) ते ७ (सात) ऑक्टोबर या कालावधीत शेतकऱ्यांसाठी धान्य, गरजू वस्तू आणि विद्यार्थ्यांसाठी वह्या, पुस्तके, दप्तर, स्टेशनरी यांसारख्या साहित्याचा पूर्ण संच घेऊन मदत टेम्पो रवाना होणार आहे.


