नेताजींचे विचार आणि बाळासाहेबांचे कार्य आजही समाजासाठी दिशादर्शक; अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांचे प्रतिपादन
पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, २४ जानेवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : “देशाच्या स्वातंत्र्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेला लढा, त्यांची शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि राष्ट्रनिष्ठा आजही प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी आहे. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या प्रखर विचारांनी आणि सामाजिक जाणीवेतून समाजातील सर्व घटकांना आत्मसन्मान मिळवून दिला,” असे गौरवोद्गार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी काढले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी, २३ जानेवारी २०२६ रोजी आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या हस्ते दोन्ही महान नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना विक्रांत बगाडे म्हणाले की, नेताजींच्या विचारांतून कर्तव्यभावना आणि देशसेवेची जाणीव निर्माण होते. तर बाळासाहेब ठाकरे यांनी प्रभावी संवादाच्या माध्यमातून जनप्रबोधनाचे मोठे कार्य केले असून त्यांच्या कार्यातून समाजाला जबाबदारीची जाणीव झाली आहे.
या कार्यक्रमास उपायुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महानगरपालिकेतील विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
