सुरक्षा रक्षक एजन्सींचा मनमानी कारभार थांबवा; राष्ट्रवादी अर्बन सेलचा पोलिसांना इशारा, चारित्र्य पडताळणी सक्तीची करण्याची मागणी
पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, २ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड : शहरातील गृहनिर्माण संस्थांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या अनेक सुरक्षा रक्षक एजन्सीजकडे अधिकृत परवाना नसून, रक्षकांची चारित्र्य पडताळणीही केली जात नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अर्बन सेल) शहराध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी पोलीस उपायुक्त सचिन हिरे यांची भेट घेऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शहरात वाढत्या गृहनिर्माण संस्थांमुळे सुरक्षा रक्षक एजन्सींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, अनेक एजन्सींची नोंदणी कामगार कल्याण विभागात झालेली नाही किंवा त्यांच्याकडे आवश्यक व्यावसायिक परवाना नाही. अत्यंत गंभीर बाब म्हणजे, सुरक्षा रक्षकांची नेमणूक करताना त्यांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (Character Verification) तपासले जात नाही. यामुळे सोसायट्यांमधील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
-
शहरातील सर्व सुरक्षा रक्षक एजन्सीची तातडीने बैठक आयोजित करावी.
-
सर्व एजन्सींना व्यावसायिक परवाना आणि रक्षकांची चारित्र्य पडताळणी सक्तीची करावी.
-
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एजन्सींवर कडक कायदेशीर कारवाई करावी.
“हे काम येत्या आठवड्यात प्रशासनाने सुरू करावे. जर सुरक्षा यंत्रणेत सुधारणा झाली नाही, तर थेट पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना निवेदन देण्यात येईल. प्रशासनाने आमच्यावर ती वेळ आणू नये,” असा सज्जड दम प्रदीप गायकवाड यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
शहरातील सोसायट्यांमध्ये वाढत्या चोऱ्या आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी सुरक्षा रक्षकांची पार्श्वभूमी तपासणे अनिवार्य आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
