जगात युद्धाचा भडका, भारतात मात्र शांतता! पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे कामगार नेत्यांकडून कौतुक; ८ मार्च रोजी पिंपरीत ‘जागतिक शांती रॅली’
पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, ०५ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : “संपूर्ण जगात सध्या युद्धाचे ढग दाटले असून मोठी जीवित व मालमत्तेची हानी होत आहे. अशा भीषण परिस्थितीतही भारत सरकारच्या खंबीर परराष्ट्र धोरणामुळे देशातील नागरिक सुखासमाधानाने नांदत आहेत. यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत,” अशा भावना राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष व कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी व्यक्त केल्या आहेत.
जागतिक शांततेचा संदेश देण्यासाठी आणि युद्धात प्राण गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने आगामी रविवारी (८ मार्च) पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे भव्य रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
आखाती देशांमधील संघर्षावर चिंता व्यक्त करताना यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, इराणला सुमारे २ लाख कोटी रुपयांचे, तर इस्रायलला २० हजार कोटींचे आर्थिक नुकसान झाले आहे. अमेरिकेलाही अब्जावधींचा फटका बसला असून हजारो निष्पाप नागरिकांनी प्राण गमावले आहेत. या संघर्षाचा सर्वाधिक फटका कष्टकरी वर्गाला बसत आहे. २१ व्या शतकात जग प्रगती करत असताना युद्धामुळे ही प्रगती २५ वर्षे मागे जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
आखाती देशांमधून जगभर पेट्रोलियम कच्च्या मालाचा पुरवठा होतो. हा संघर्ष अधिक काळ चालल्यास:
-
जागतिक स्तरावर इंधनाचे दर प्रचंड वाढतील.
-
महागाई वाढल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडेल.
-
उद्योगांवर परिणाम होऊन बेरोजगारीचे संकट ओढवेल.
या पार्श्वभूमीवर भारतासह सर्व प्रमुख राष्ट्रांनी पुढाकार घेऊन तातडीने शांतता प्रस्थापित करावी, असे आवाहन भोसले यांनी केले आहे.
श्रमिक आणि कष्टकरी बांधवांच्या वतीने जागतिक शांततेसाठी ८ मार्च २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता संत तुकाराम नगर येथे ही रॅली निघणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून जगाला शांततेचा संदेश दिला जाणार असून, युद्धाचा निषेध नोंदवला जाईल.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।
