पुणेकरांचा प्रवास सुसाट! विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण; वाहतूक कोंडीतून मिळणार कायमची सुटका
पुणे/पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, ०८ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे : पुणे शहराच्या पश्चिम भागातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे (Video Conferencing) करण्यात आले. “पायाभूत सुविधांच्या बळावर पुण्याच्या विकासाला गती देणे हे आमचे प्राधान्य असून, हा पूल पुणेकरांच्या सेवेत रुजू झाल्यामुळे गणेशखिंड रस्त्यावरील कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
या सोहळ्यास उपमुख्यमंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. योगेश म्हसे उपस्थित होते.
विद्यापीठ चौकातील जुना अपुरा पूल पाडून नवीन आधुनिक दुमजली पूल उभारण्याचा निर्णय घेताना अनेक आव्हाने होती. मात्र, दिवंगत अजित पवार यांनी या प्रकल्पासाठी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरला. या पुलाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी सकारात्मक ग्वाही दिली.
पुलाची खास वैशिष्ट्ये:
-
एकात्मिक रचना: वरच्या स्तरावर मेट्रो मार्ग आणि खालच्या स्तरावर रस्ते वाहतूक अशी ही दुमजली व्यवस्था आहे.
-
वाहतुकीचे नियोजन: औंध व बाणेरकडून शिवाजीनगरकडे जाण्यासाठी स्वतंत्र रॅम्प, सेनापती बापट रोडशी जोडणी आणि विशेष अंडरपास यामुळे सिग्नलमुक्त प्रवास शक्य होणार आहे.
-
विक्रमी वेग: कोरोनासारख्या कठीण काळातही हा प्रकल्प सुमारे २७७ कोटी रुपये खर्च करून १,७६३ मीटर लांबीचा उभारण्यात आला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, पुणे हे केवळ आयटी हब राहिले नसून ते आता ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स’चे (GCC) केंद्र बनले आहे. वाढत्या औद्योगिक गरजा लक्षात घेऊन रिंग रोड, मेट्रोचे जाळे आणि भुयारी मार्गांच्या माध्यमातून पुण्याचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही अर्थसंकल्पातील तरतुदींचा उल्लेख करत पुणे शहराला मुंबईच्या धर्तीवर ‘ग्रोथ हब’ म्हणून विकसित करण्याचा निर्धार व्यक्त केला.
-
एकूण लांबी (रॅम्पसह): १७६३.५२ मीटर.
-
प्रकल्प खर्च: ₹२७७ कोटी.
-
प्रमुख जोडणी: औंध, बाणेर, पाषाण, पाषाण आणि शिवाजीनगर.
-
विशेष: ५५ मीटर लांबीचा भव्य स्टील गर्डर बसवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
या प्रकल्पामुळे हिंजवडी आयटी पार्क आणि शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या वाचणार आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


