अमरावती विद्यापीठात ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’ संपन्न; ३८ तरुणांना मिळाली टीसीएसमध्ये नोकरीची संधी
अमरावती, प्रतिनिधी विलास सावळे, २६ मार्च २०२६ | मॅक्स मंथन शैक्षणिक विशेष:
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’ उत्साहात पार पडला. या मेळाव्याच्या माध्यमातून ३८ उमेदवारांना नामांकित टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीत निवडीची पत्रे देण्यात आली.
विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित या मेळाव्याचे उद्घाटन विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एच. आर. देशमुख आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. एच. आर. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला दिला. “नोकरी मिळाली नाही तरी खचून जाऊ नका, उलट नव्या जिद्दीने पुन्हा सुरुवात करा,” असा संदेश त्यांनी दिला. तर डॉ. नितीन कोळी यांनी तरुणांना केवळ नोकरी मिळवणारे न होता, नोकरी देणारे (उद्योजक) बनण्याचे आवाहन केले.
-
प्रमुख कंपनी: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS).
-
सहभाग: २०० रिक्त पदांसाठी एकूण २८८ उमेदवारांनी आपली नोंदणी केली होती.
-
निवड: सखोल निवड प्रक्रियेनंतर ११२ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
-
अंतिम नियुक्ती: ३८ पात्र उमेदवारांना प्रत्यक्ष नियुक्तीची पत्रे प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजीव बोरकर यांनी केले. “टी.सी.एस. सारख्या नामांकित कंपनीत काम करण्याचे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते, ते पूर्ण करण्यासाठी विद्यापीठ सतत प्रयत्नशील आहे,” असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी आभार मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।
.

