भाई वैद्य म्हणजे एक प्रगल्भ विचार; माजी गृहमंत्र्यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंचवडमध्ये कष्टकरी महासंघाचे अभिवादन
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दिनांक: २ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:
चिंचवड: “समाजवादी विचारवंत आणि माजी गृहमंत्री भाई वैद्य यांनी मोठी पदे भूषवूनही त्यांच्यातील सामान्यपण कधीच लोप पावले नाही. त्यांनी निरपेक्ष भावनेतून केलेले कार्य उत्तुंग असून भाई वैद्य म्हणजे एक प्रगल्भ विचार होते,” असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले.
माजी गृहमंत्री भाई वैद्य यांच्या स्मृतिदिनानिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्रच्या वतीने चिंचवड येथे ‘भाई वैद्य आणि कामगार’ या विषयावर मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते.
पुरुषोत्तम सदाफुले पुढे म्हणाले की, “भाई वैद्य हे आयुष्यभर सामाजिक समता आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांसाठी संघर्ष करत राहिले. त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा देण्याचे महान कार्य केले. विशेषतः अमिनेशन फॅक्टरी (Amunition Factory) येथे संघटनात्मकरीत्या काम करून त्यांनी कामगारांना न्याय मिळवून दिला. पिंपरी-चिंचवड शहराशी भाईंचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. कामगारांच्या हातात मोठी ताकद आहे; ज्याप्रमाणे पाणी नदीत गेले की गंगाजळ होते आणि हातात आले की तीर्थ होते, तसेच कामगारांचे हात श्रेष्ठ आहेत. या कामगारांच्या ताकदीतूनच आपल्याला बलशाही राज्य घडवायचे आहे.”
यावेळी श्रमश्री बाजीराव सातपुते यांनीही भाई वैद्य यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले. भाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
या अभिवादन सभेला कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, कामगार कवी प्रभाकर वाघोले, निमंत्रक सखाराम केदार, राजेश माने, शारदा तांबे, शीतल अनुसे, नौसीन तांबोळी, सुमैय्या पठाण, अंबिका घुमटे, शिला सरदार, निलावती पचारे, पूजा वाशीमकर, अशोक पोळ, बाबासाहेब खराडे, धनाजी लिमकर, सुनील जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने अत्यंत उत्साहात करण्यात आले असून, भाई वैद्य यांच्या स्मृतींना यावेळी भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


