news
Home अमरावती नाशिकमध्ये घुमणार अंधश्रद्धा निर्मूलनाचा आवाज! उद्या सिटू कामगार भवनात राज्यस्तरीय परिषद

नाशिकमध्ये घुमणार अंधश्रद्धा निर्मूलनाचा आवाज! उद्या सिटू कामगार भवनात राज्यस्तरीय परिषद

खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन; भोंदूगिरीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी कार्यकर्त्यांचा एल्गार | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

फलज्योतिष आणि बुवाबाजी विरोधी लढा तीव्र करणार; नाशिकमध्ये उद्या राज्यस्तरीय संघर्ष परिषद

 

 

 

अमरावती/नाशिक, प्रतिनिधी विलास सावळे, दिनांक: २ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती/नाशिक: नाशिकमधील भोंदू अशोक खरात याच्या कृष्णकृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, बुवाबाजीचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी आणि दैववादी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने नाशिक येथे एक दिवसीय राज्यस्तरीय फलज्योतिष व बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार, दि. ३ एप्रिल २०२६ रोजी सिटू कामगार भवन, खुटवड नगर, नाशिक येथे ही परिषद संपन्न होणार आहे. या परिषदेत विदर्भ आणि अमरावती जिल्ह्यातील सर्व शाखांच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अंनिसचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार व अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल्ल मंदा श्रीधर यांनी केले आहे.

  • उद्घाटक: मा. खासदार वर्षाताई गायकवाड (मुंबई).

  • भूमिका मांडणी: संजय बनसोडे (राज्य कार्याध्यक्ष, अंनिस).

  • विशेष मनोगत: कॉ. डी. एल. कराड (नाशिक).

सत्र १: “ऐसे कैसे झाले भोंदू”

या सत्रात इस्लामपूर येथील प्राचार्य डॉ. नितीन शिंदे मार्गदर्शन करतील, तर अध्यक्षस्थानी सोलापूरचे दादा चांदणे असतील.

सत्र २: “बुवाबाजी विरोधी संघर्ष: गुन्हे, तपास आणि कायदा”

निवृत्त पोलीस उपायुक्त बाबासाहेब बुधवंत, ॲड. रंजना गवांदे आणि मनोविकारतज्ज्ञ डॉ. जयंत ढाके या सत्रात शास्त्रीय आणि कायदेशीर मांडणी करतील.

समारोप: “बुवाबाजी विरोधी निर्धार”

शहरातून भव्य रॅली काढल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार व लेखक उत्तम कांबळे यांच्या मार्गदर्शनाने परिषदेचा समारोप होईल. या सत्राच्या अध्यक्षस्थानी अंनिसचे राज्य अध्यक्ष माधव बावगे (लातूर) भूषवतील.

अंनिसने गेल्या ३६ वर्षांत हजारो भोंदू बाबांचा भांडाफोड केला आहे. मात्र, राजकारणी, प्रशासकीय अधिकारी आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या छुपा पाठिंब्यामुळे अशोक खरात सारखे नवनवीन भोंदू उदयाला येत आहेत. महिलांचे लैंगिक, आर्थिक आणि मानसिक शोषण करणाऱ्या या रॅकेट विरोधात जनमानस तयार करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.

या परिषदेच्या यशस्वीतेसाठी अमरावती जिल्हा व शहर शाखेचे पदाधिकारी सुभाष गौरखेडे, विजय डवरे, रवींद्र फुले, वर्षा गावंडे, दिलीप लाडे, नरेंद्र धर्माळे, सचिन खोब्रागडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!