ज्येष्ठ लेखिका रजिया सुलताना यांच्या ‘गाडगेबाबांच्या कीर्तनातील समाजचिंतन’ पुस्तकाचे प्रकाशन
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २७ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका रजिया सुलताना यांच्या ‘गाडगेबाबांच्या कीर्तनातील समाजचिंतन’ या नव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पुणे येथील एस.एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन येथे उत्साहात पार पडला. रजिया सुलताना यांचे सामाजिक विषयावर भाष्य करणारे हे ४० वे पुस्तक आहे.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक अशोकजी धिवरे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे, उत्तराखंड महिला आयोगाच्या उपाध्यक्षा शायरा बानो, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी आणि हैदराबादचे प्रसिद्ध कथालेखक शेख युसूफ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या भाषणात गाडगेबाबांच्या विचारांची आजच्या समाजाला असलेली गरज आणि रजिया सुलताना यांनी त्यांच्या कीर्तनातील समाजचिंतन ज्या पद्धतीने मांडले आहे, त्याचे कौतुक केले. रजिया सुलताना यांनी आपल्या लेखणीतून सातत्याने सामाजिक प्रश्न आणि महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले असल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले.
या प्रकाशन सोहळ्याला पुण्यातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्य प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रशियन भाषातज्ज्ञ ईशाद वडगावकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार दिलावर शेख यांनी मानले. राष्ट्रगीताने या सोहळ्याचा समारोप करण्यात आला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
