news
लुटियन्स दिल्लीतील ‘उच्चभ्रूंचा’ अड्डा बंद! साम्राज्यवादी मानसिकतेच्या ‘दिल्ली जिमखाना क्लब’वर मोदी सरकारचा हातोडाप्रशासनाचा पाठीचा कणा असलेल्या महसूल यंत्रणेला अपर मुख्य सचिव विकास खारगे यांचे कडक ताकीद! आठवड्यातून एक दिवस गावपातळीवर तपासणी बंधनकारकपिंपरी-चिंचवड शहर १५ दिवस हाय अलर्टवर! पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकरांकडून जमावबंदीचे कडक आदेश जारी“सरकार भांडवलदारांच्या भूमिकेत, कामगारांना एकत्र येणे अनिवार्य!” चिंचवडमधील भव्य चर्चासत्रात डॉ. श्रीपाल सबनीस यांचे कडक प्रतिपादन‘एआय फॉर सायन्स’च्या नव्या सुवर्णयुगाची नांदी! जगप्रसिद्ध ‘डॅडलस’ नियतकालिकात ३३ जागतिक वैज्ञानिकांचे मोठे विचारमंथन
Home पिंपरी चिंचवड “सरकार भांडवलदारांच्या भूमिकेत, कामगारांना एकत्र येणे अनिवार्य!” चिंचवडमधील भव्य चर्चासत्रात डॉ. श्रीपाल सबनीस यांचे कडक प्रतिपादन

“सरकार भांडवलदारांच्या भूमिकेत, कामगारांना एकत्र येणे अनिवार्य!” चिंचवडमधील भव्य चर्चासत्रात डॉ. श्रीपाल सबनीस यांचे कडक प्रतिपादन

कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने भरत शिंदे यांना 'कामगार रत्न' अन् पत्रकार जयंत जाधव यांना 'कामगार सन्मित्र' पुरस्कार प्रदान; कामगार चळवळीतील दिग्गजांचे महत्त्वपूर्ण विचारमंथन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल; कामगार गुलाम नव्हे तर राष्ट्राची अस्मिता! – डॉ. श्रीपाल सबनीस

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २३ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

चिंचवड: “कामगारांच्या एकजुटीचा आणि ताकतीचा मोठा ऐतिहासिक वारसा या देशाला लाभला आहे. कामगार हा कोणाचा गुलाम नसून तो या राष्ट्राची खरी अस्मिता आहे. त्याच्या अथांग घामाचे आणि कष्टाचे मूल्य समाजाने व सरकारने जपले पाहिजे. दुर्दैवाने आजच्या काळात कामगारांचे वाली कमी होत चालले आहेत. सरकार स्वतः भांडवलदारांची भूमिका घेत कामगारांचा गळा घोटत असताना, कामगार संघटनांनी आपली विश्वासार्हता जपत कामगारांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहणे काळाची गरज आहे. कामगारांनो, आता एक व्हा आणि एक राहा! आव्हाने कितीही मोठी असली तरी बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळातही कामगार रस्त्यावर उतरून लढेल आणि जिंकेलही,” असा ठाम विश्वास ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केला.

कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने चिंचवड येथील रोटरी क्लब संभाजीनगर सभागृहात ‘कामगार क्षेत्र : काल, आज आणि उद्या’ या विषयावर भव्य चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. सबनीस बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर संयोजक तथा कामगार नेते काशिनाथ नखाते, कष्टकरी नेते मानव कांबळे, राज्य किमान वेतन सल्लागार समितीचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक, महाराष्ट्र मजदूर संघाचे अध्यक्ष इरफान सय्यद, कामगार नेते सचिन लांडगे, ज्येष्ठ पत्रकार जयंत जाधव, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातूर्डेकर, किमया कम्युनिकेशन्सचे जयंत शिंदेआशिष शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात आधुनिक भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे आणि पद्मश्री जनकवी नारायण सुर्वे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. चर्चासत्राच्या सुरुवातीला सादर झालेल्या “आता उठवू सारे रान…” या सुप्रसिद्ध कामगार गीताला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रचंड दाद दिली.

या सोहळ्यात उल्लेखनीय कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये यंदाचा मानाचा ‘कामगार रत्न पुरस्कार’ भरत शिंदे यांना प्रदान करण्यात आला, तर कामगारांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडल्याबद्दल दैनिक सकाळचे पत्रकार जयंत जाधव यांना ‘कामगार सन्मित्र पुरस्कारा’ने गौरविण्यात आले.

प्रास्ताविक भाषण करताना कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी कामगार चळवळीच्या इतिहासाला उजाळा दिला. ते म्हणाले, “यापूर्वी राज्यात गिरणी कामगारांपासून ते आजवर जे जे मोठे लढे झाले, त्यातून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. देशाच्या विकासात शेतकरी आणि कामगारांची भूमिका नेहमीच निर्णायक राहिली आहे. देशातील शेतकरी वर्षभर एकत्र लढले आणि शेवटी जिंकले; आता तीच वेळ कामगारांवर आली आहे. संघटना वेगवेगळ्या असल्या तरी नव्या कामगार कायद्यातील जाचक अटी बदलण्यासाठी आणि कामगार हिताच्या दुरुस्तीसाठी सर्वांनी एका छताखाली येऊन भविष्याची दिशा ठरवणे अनिवार्य आहे.”

ज्येष्ठ नेते मानव कांबळे यांनी प्रशासकीय उदासीनतेवर बोट ठेवत सांगितले, “शहराच्या सुरुवातीच्या काळात कामगारांना हक्काची घरे, रोजगार आणि सन्मानजनक पगारवाढ मिळत होती. मात्र, आजच्या कंत्राटी युगात कामगारांच्या पदरात काहीच पाडले जात नाही. पिंपरी-चिंचवड शहराला कामगार नगरी बनवण्यात दादा रुपमय चटर्जी, प्रभाकर मानकर, श्री. पिल्ले, विनायक चक्रे यांचे योगदान आपण विसरता कामा नये. त्यांच्याच प्रेरणेने आम्ही भूतकाळात बजाज कंपनीचा ऐतिहासिक लढा यशस्वी केला होता.”

सचिन लांडगे: “कामगार लढ्याचा इतिहास हा बलिदानाचा आहे. अनेक कामगारांनी शहीदत्व स्वीकारले पण ते तत्त्वांपासून बाजूला गेले नाहीत. आजच्या तरुण कामगारांनी कामगार कायदे सखोल समजून घेतले पाहिजेत आणि आपल्या संघटनेशी एकनिष्ठ राहिले पाहिजे.”

इरफान सय्यद: “नव्या कामगार कायद्यातील तरतुदींमध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत तर काहींमध्ये कामगारविरोधी बदल आहेत. त्या बदलांविरोधात संघटनात्मक पातळीवरील संघर्ष सुरूच ठेवावा लागेल.”

रघुनाथ कुचिक: “कामगारांच्या वेतनश्रेणीत तातडीने दुरुस्त्या करणे गरजेचे आहे. आम्ही यापूर्वी कंपन्यांचे ८७ गट निर्माण करून काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते. तळेगाव येथील ‘जनरल मोटर्स’ कंपनी बंद पडल्याने जसे कामगारांचे अतोनात नुकसान झाले, तसे इतर कंपन्यांच्या बाबतीत होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.”

कामगार नेते घावटे: “शहरात उद्योग उभे राहिले म्हणून कामगारांचा विकास झाला आणि कामगार पुढे गेले. आता बदलत्या काळाशी आणि जागतिकीकरणाशी जोडून घेत कामगारांनी स्वतःला अधिक सक्षम केले पाहिजे.”

हे चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी सिद्धनाथ देशमुख, राजेश माने, किरण साडेकर, माधुरी जलमूलवार, मुमताज शेख, तुषार घाटुळे, स्वाती पालके, चंद्रकांत कुंभार, अनिल बारवकर, सुनील भोसले, लाला राठोड यांनी अतोनात परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी राजू बिराजदार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!