news
Home पिंपरी चिंचवड महात्मा फुले वाड्यात वटपौर्णिमा साजरी केल्याने पुण्यात नवे सामाजिक वादळ; खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर बहुजन समाजाचा तीव्र प्रहार!

महात्मा फुले वाड्यात वटपौर्णिमा साजरी केल्याने पुण्यात नवे सामाजिक वादळ; खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर बहुजन समाजाचा तीव्र प्रहार!

फुले दांपत्याच्या पुरोगामी विचारांना आणि सत्यशोधक परंपरेला आव्हान दिल्याचा ओबीसी संघटनांचा आरोप; कोथरूड सोडून गंज पेठेत येण्यामागच्या हेतूवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पुण्यातील गंज पेठेतील महात्मा फुले वाड्यात ‘वटपौर्णिमा’ साजरी करण्यावरून बहुजन समाजात तीव्र संताप; खासदार मेधा कुलकर्णी यांच्या कृत्यावरून पुण्यात संतापाची लाट

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , ३० जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड : क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर ज्या सनातनी, कर्मठ आणि विषमतेवर आधारित रूढी-परंपरांविरुद्ध संघर्ष केला, त्याच ऐतिहासिक महात्मा फुले वाड्यात जाऊन भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी वडाच्या झाडाचे पूजन केल्याने पुण्यात नवे सामाजिक व राजकीय वादळ निर्माण झाले आहे. हा प्रकार केवळ एक सण साजरा करण्याचा भाग नसून, त्यामागे जाणीवपूर्वक केलेला राजकीय आणि सामाजिक डाव असल्याचा गंभीर आरोप बहुजन व ओबीसी समाजातील विविध घटकांकडून केला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात संतापाची लाट उसळली आहे.

खासदार मेधा कुलकर्णी या प्रामुख्याने कोथरूड भागात वास्तव्यास असताना, त्यांना वटपौर्णिमेच्या पूजेसाठी पुण्यातील इतर कुठलीही जागा न मिळता थेट गंज पेठेतील महात्मा फुले वाड्याचीच जागा कशी काय दिसली, असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक श्रद्धेचा भाग असू शकतो, परंतु ज्या वास्तूने देशाला समता, तर्कशुद्धता आणि पुरोगामित्वाची शिकवण दिली, जिथे सत्यशोधक समाजाची पायाभरणी झाली, त्याच ‘महात्मा फुले वाड्याची’ निवड करण्यामागे मेधा कुलकर्णी यांचा नेमका हेतू काय, अशी विचारणा आता केली जात आहे. हा प्रकार थेट बहुजन समाजाच्या अस्मितेला आणि फुले दांपत्याच्या पुरोगामी विचारांना दिलेले आव्हान असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत म्हटले आहे की, पुण्यामध्ये अजूनही मनुस्मृतीला आपली घटना मानणाऱ्या प्रवृत्ती अस्तित्वात आहेत, हेच या कृत्यातून सिद्ध होत आहे. इतिहास साक्षी आहे की, जेव्हा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी बहुजनांसाठी आणि महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली, तेव्हा तत्कालीन सनातनी प्रवृत्तींनी त्यांच्या कार्याला आणि विचारांना प्रचंड विरोध केला होता. आजच्या काळात थेट विरोध करणे शक्य नसल्याने, त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा आणि वारशाचा पराभव करण्यासाठी अशा मार्गांचा अवलंब केला जात असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

 महात्मा फुले वाड्यासारख्या पवित्र क्रांतीभूमीचे ‘सनातनीकरण’ करण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला कट असून, महात्मा फुलेंनी ज्या रूढी-परंपरांवर आयुष्यभर कडाडून प्रहार केला, त्याच परंपरा त्यांच्याच ऐतिहासिक घरात आणून मिरवणे हा कृतघ्नपणाचा कळस आहे, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात वैचारिक दहशत निर्माण करणाऱ्या अशा प्रवृत्तींना बहुजन समाज योग्य वेळी धडा शिकवेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या या कृत्यामुळे पुण्याच्या सांस्कृतिक आणि पुरोगामी प्रतिमेला काळिमा फासली गेली असून सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे, असा सूर उमटत असून या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी आता संपूर्ण ओबीसी आणि बहुजन समाज एकवटताना दिसत आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!