सांगवी-बोपोडी पुलावरील टवाळखोरी आणि महिलांच्या छेडछाडीविरोधात युवासेना आक्रमक! जिल्हा उपाध्यक्ष मेघराज लोखंडे यांचे मनपा अतिरिक्त आयुक्तांना मागण्यांचे निवेदन; तातडीने सीसीटीव्ही आणि प्रकाशव्यवस्था करण्याची मागणी
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १८ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
सांगवी आणि बोपोडी परिसराला जोडणाऱ्या ‘सरकार शितोळे सेतू’ (सांगवी-बोपोडी पूल) वर गेल्या काही दिवसांत वाढलेली टवाळखोरी, महिलांची होणारी छेडछाड आणि त्यामुळे निर्माण झालेल्या असुरक्षित वातावरणाविरोधात शिवसेना युवासेनेने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. नागरिकांच्या, विशेषतः महिला व भगिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर, युवासेनेचे मावळ लोकसभा जिल्हा उपाध्यक्ष मेघराज (प्रिया सिद्धार्थ) लोखंडे यांनी थेट पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (२) तृप्ती सांडभोर यांची भेट घेऊन त्यांना तातडीच्या उपाययोजनांबाबत कडक शब्दांत मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले.
नेहमीच सर्वसामान्यांच्या आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी धावून जाणाऱ्या मेघराज लोखंडे यांच्या या तत्परतेमुळे परिसरातील नागरिकांमधून आणि महिलांमधून त्यांचे विशेष आभार मानले जात आहेत.
सांगवी-बोपोडी पुलावर रात्रीच्या वेळी आणि निर्जन प्रसंगी टवाळखोर तरुण मोठ्या संख्येने गोळा होत असून, तिथून जाणाऱ्या महिला व विद्यार्थिनींची छेडछाड करत असल्याच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. या गंभीर समस्येची दखल घेत युवासेना नेते मेघराज लोखंडे यांनी तात्काळ मनपा प्रशासनाकडे धाव घेतली. महानगरपालिकेच्या विद्युत व दूरसंचार विभागाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी चालढकल न करता युद्धपातळीवर पावले उचलावीत, अशी ठाम मागणी त्यांनी अतिरिक्त आयुक्तांकडे केली आहे.
नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी मेघराज लोखंडे यांनी निवेदनाद्वारे मागण्या प्रशासनासमोर मांडल्या आहेत. १. सांगवी-बोपोडी पुलावर (सरकार शितोळे सेतू) टवाळखोरांवर नजर ठेवण्यासाठी तात्काळ उच्च क्षमतेचे (High-Definition) सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. २. हे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे महानगरपालिका आणि थेट पोलीस नियंत्रण कक्षाशी (Police Control Room) जोडण्यात यावेत, जेणेकरून अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांना त्वरित कारवाई करता येईल. ३. पुलावर अनेक ठिकाणी अंधाराचे साम्राज्य असते, ही संधी साधून टवाळखोर तिथे बसतात. त्यामुळे संपूर्ण पुलावरील प्रकाशव्यवस्था सक्षम करून अतिरिक्त एलईडी (LED) दिवे बसविण्यात यावेत. ४. या कामाच्या संवेदनशीलतेचा विचार करून संबंधित विभागाला तातडीने प्रशासकीय व तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात यावी. ५. या समस्येवर महानगरपालिकेने काय पावले उचलली, याचा सविस्तर लेखी अहवाल उपलब्ध करून देण्यात यावा.
यावेळी बोलताना युवासेना जिल्हा उपाध्यक्ष मेघराज लोखंडे म्हणाले, “सरकार शितोळे सेतू हा या परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. या पुलावरून आपली मुले, महिला, भगिनी मोठ्या आशेने प्रवास करतात. मात्र, काही समाजकंटकांमुळे जर येथे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत असेल, तर युवासेना ते शांतपणे सहन करणार नाही. प्रशासनाने लोकभावनेचा आदर करून त्वरित सीसीटीव्ही आणि विजेचे दिवे बसवावेत. जर यात दिरंगाई झाली, तर नागरिकांच्या हक्कासाठी अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
मेघराज लोखंडे यांनी नेहमीप्रमाणेच जनसामान्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन प्रशासनाला धारेवर धरल्यामुळे, सांगवी-बोपोडी परिसरातील रहिवाशांमध्ये प्रशासनाकडून लवकरच योग्य कारवाई होईल, असा विश्वास निर्माण झाला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
