नीट परीक्षा घोटाळा आणि सोनम वांगचुक यांच्या अटकेविरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये “जवाब दो” आंदोलन! अपना वतन व समविचारी संघटनांकडून केंद्र सरकारचा तीव्र निषेध
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १८ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ (NEET) परीक्षा घोटाळ्यातील गैरव्यवहाराची सखोल चौकशी व्हावी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे मागील २० दिवसांपासून अन्नत्याग करून उपोषणाला बसलेले प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व वैज्ञानिक सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आज पिंपरी-चिंचवड शहरात संतापाची लाट उसळली. शनिवार, दिनांक १८ जुलै २०२६ रोजी अपना वतन संघटना आणि शहरातील विविध समविचारी संघटनांच्या वतीने केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी सिद्दीकभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड घोषणाबाजीत “जवाब दो” आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी आज पहाटे सोनम वांगचुक यांचे आंदोलन दडपशाहीने उधळून लावल्याचा आणि त्यांना अटक केल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
केंद्र सरकारच्या असंवेदनशील कारभाराविरोधात पिंपरी-चिंचवडमधील नामांकित सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी एकाच मंचावर आले होते. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानवजी कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रवीण कदम, अंनिसच्या रोहिणी कांबळे, मूलनिवासी संघटनेचे अंजुम इनामदार, समाजवादी पार्टीचे रवी यादव, राजन नायर, ब्रह्मानंद जाधव, प्रदीप पवार, गणेश दराडे, वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे सालार शेख, फेरोज तांबोळी, पँथर सेनेचे राजू सरोदे, प्रकाश घोडके, प्रमोद शिंदे आदी दिग्गज उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना ज्येष्ठ समाजसेवक मानवजी कांबळे म्हणाले, “सोनम वांगचुक हे स्वतःसाठी नव्हे, तर देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराच्या सुधारणेसाठी लोकशाही मार्गाने उपोषण करत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व समविचारी संघटना त्यांच्या या लढ्यात खंबीरपणे पाठीशी उभ्या आहेत.”
तर माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी, “देशातील लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले असून, ते वाचवण्यासाठी आता नागरिकांनी स्वतः जागृत होऊन सरकारच्या चुकीच्या धोरणांना व हुकूमशाहीला कडाडून विरोध केला पाहिजे,” असे आवाहन केले.
आंदोलनाचे मुख्य आयोजक व ‘अपना वतन’ संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी सोनम वांगचुक यांच्या देशकार्याचा गौरव करत केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले:
“सोनम वांगचुक यांनी लडाखमध्ये शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडवून आणली आहे. सीमेवर तैनात असलेल्या आपल्या जवानांचे उणे तापमानापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी ‘तांत्रिक तंबू’ (Technical Tents) आणि पाणी बचतीची अभिनव यंत्रणा विकसित केली आहे. त्यांच्या या महान संशोधनाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेऊन त्यांना ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. याच भाजप सरकारने २०१९ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला. मात्र, आज जेव्हा ते नीट परीक्षेतील घोटाळ्यावर प्रश्न विचारत आहेत, तेव्हा हेच केंद्र सरकार असंवेदनशील बनले आहे.”
शेख पुढे म्हणाले की, २० दिवस अन्नत्याग करूनही सरकारने आंदोलकांशी साधी चर्चा करण्याचे सौजन्य दाखवले नाही. उलट आज पहाटे त्यांचे आंदोलन बळाचा वापर करून उधळून लावले आणि त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला. केंद्र सरकारची ही दडपशाही अत्यंत निषेधार्ह असून अपना वतन संघटना वांगचुक यांच्या पाठीशी ठाम उभी आहे.
या आंदोलनात अपना वतन संघटनेचे जितेंद्र जुनेजा, राजश्री शिरवळकर, गणेश जगताप, चांद सय्यद, तौफिक पठाण, हाजीमलंग शेख, शौकत शेख, सोमनाथ देवकर, अल्ताफ शेख, अकील सय्यद, मारुती वेताळ , गंगाराम वेताळ, वैभव जाधव, मोहम्मद अजीज, अनिल कारेकर, विजय पवार यांच्यासह शेकडो सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या”, “सोनम वांगचुक आगे बढो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


