अन्नत्याग आंदोलनाचा चेंडू आता जिल्हाधिकारी यांच्या दालनात
७ मे रोजी जिल्हाधिकारी सोबत शेतकरी मंडळाच्या बैठकीचे आयोजन
अकोला/मूर्तिजापूर , प्रतिनिधी :- विलास सावळे
अतिवृष्टीची मदत आणि पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाच्या विनंतीनंतर हे आंदोलन ८ मे पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ वानखडे, भारतीय किसान संघाचे राहुल राठी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कैलास साबळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला.
कुरूम, हातगाव, निंबा आणि जामठी या महसूल मंडळातील अनेक शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वगळले गेले आहेत. त्यातच मागील वर्षाचा पीक विमा देखील अद्याप न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांनी पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांना वेळोवेळी निवेदने देऊन मदतीची मागणी केली होती. मात्र, अनेक दिवस उलटूनही मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांनी १ मे रोजी अन्नत्याग आंदोलनाचा मार्ग निवडला होता.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी मंडळांची तातडीची बैठक आयोजित केली. या बैठकीत विविध गावांतील सुमारे ६० शेतकरी प्रतिनिधींनी भाग घेतला. बैठकीत पीक विमा, पीक पाहणी आणि कापणी अहवालाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, तसेच अतिवृष्टीची रखडलेली मदत यांसारख्या अनेक मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. अनेक शेतकऱ्यांनी यावेळी आपल्या समस्या आणि प्रश्न मांडले.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. पीक कापणी अहवालासंबंधी जून महिन्यात कार्यशाळा आयोजित करणे आणि पीक विम्यासंबंधीच्या समस्या सोडवण्यासाठी दरमहा बैठका घेणे यावर त्यांनी भर दिला. या निर्णयांवर जातीने लक्ष ठेवण्याचे आश्वासनही त्यांनी शेतकऱ्यांना दिले. त्यांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
आता या आंदोलनाचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात पोहोचला आहे. येत्या ७ मे रोजी अकोला येथे जिल्हाधिकाऱ्यांसोबत शेतकरी मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास, ८ मे पासून राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याचा निर्धार राजू वानखडे, राहुल राठी, कैलास साबळे आणि इतर शेतकरी प्रतिनिधींनी जाहीर केला आहे. या बैठकीत सुभाष मोरे, छोटू पाटील बोंडे, प्रफुल्ल मालधूरे यांच्यासह अनेक प्रमुख शेतकरी नेते उपस्थित होते. आता जिल्हाधिकारी या बैठकीत काय तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
