अकोला (मॅक्स मंथन डेली न्यूज)विलास सावळे अकोला : अतिवृष्टीमुळे मदतीपासून वंचित राहिलेल्या मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासन सकारात्मक भूमिका घेत आहे. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी १७ मे रोजी या शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन त्यांना मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीत मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीप अपार, प्रभारी तहसीलदार उमेश बनसोड, प्रभारी तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गोरे आणि पीक विमा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मूर्तिजापूर तालुक्यातील आठपैकी हातगाव, निंबा, जामठी आणि कुरूम या चार महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या मदतीतून वगळण्यात आल्याने त्यांच्यात मोठी नाराजी होती.
या पार्श्वभूमीवर, प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ वानखडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कैलास साबळे आणि भारतीय किसान संघाचे राहुल राठी यांनी १ मे पासून मूर्तिजापूर येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाची दखल घेत उपविभागीय अधिकारी संदीप अपार आणि तहसीलदार मूर्तिजापूर यांनी तातडीने मदतीपासून वंचित शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या दालनात सभा घेण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीपर्यंत पुढे ढकलले.

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की, त्यांनी अमरावती आयुक्तांमार्फत अतिवृष्टीच्या नुकसानीचा अहवाल शासनाला पाठवला आहे. यासोबतच, आतापर्यंत मिळालेला पीक विमा आणि मंजूर होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झालेल्या पीक विम्याचा आढावा घेतला. ते म्हणाले, “आम्ही सर्व शेतकऱ्यांसोबत आहोत आणि वगळलेली अतिवृष्टीची मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री आकाश पुंडकर यांच्याशीही आजच चर्चा करून शक्य ते सर्व प्रयत्न करू.”
या बैठकीला राजूभाऊ वानखडे, राहुल राठी, छोटू पाटील बोंडे (कुरुम), डॉ. गोपाल बोळे (जामठी), प्रीतम देशमुख (निंबा), जगदीश जोगळे (हातगाव), नंदकिशोर बबानिया (रामटेक), आनंद बांगड, मुन्ना नाईकनवरे, सचिन काकड आणि अरुण बोंडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
या बैठकीमुळे मदतीची आशा निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
