निगडी (मॅक्स मंथन डेली न्यूज): निगडी प्राधिकरणमध्ये प्रस्तावित असलेल्या हरित सेतू प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आणि संभाव्य समस्या व उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पाच्या अनेक पैलूंवर सखोल विचारमंथन झाले.
बैठकीत उपस्थित नागरिकांनी हरित सेतू प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता, फुटपाथवर टपरीधारक आणि हातगाड्यांचा होणारा त्रास, सायकल ट्रॅक व वाहन पार्किंगमुळे होणारी गर्दी, फुटपाथवरील बाकड्यांमुळे अनैतिक कृत्ये होण्याची भीती यांसारख्या अनेक समस्यांवर चिंता व्यक्त केली. विशेष म्हणजे, प्राधिकरणातील निवासी भागातही हा प्रकल्प लागू करण्याच्या निर्णयावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उभे केले. लहान आणि मोठ्या रस्त्यांसाठी एकच धोरण कसे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शहरातील विविध भागांमध्ये वेगवेगळ्या नावांनी (अर्बन स्ट्रीट, स्मार्ट सिटी रस्ते) राबवलेल्या अशाच प्रकारच्या प्रकल्पांमुळे पिंपळे सौदागर, काळेवाडी, रहाटणी, जगताप डेरी, वाकड, गुरु पिंपळे, सांगवी आणि दापोडी ते निगडी या मार्गावर आधीच वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे, या अनुभवांच्या आधारावर निगडी प्राधिकरणात हरित सेतू प्रकल्प नको, असा स्पष्ट सूर नागरिकांनी व्यक्त केला.
या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार, या प्रकल्पाच्या विरोधात प्राधिकरणवासीयांची सह्यांची मोहीम चालवण्यात येणार आहे. या सह्यांचे पत्र आणि नागरिकांच्या हरकतींचे निवेदन लवकरच मा. आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना सादर केले जाईल.
जर आयुक्तांनी नागरिकांच्या हरकती आणि सूचनांवर सकारात्मक तोडगा काढला नाही, तर येत्या काळात जनजागृती करून न्यायालयात याचिका दाखल करण्यासारख्या आंदोलनात्मक मार्गांचा अवलंब करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे.

आज झालेल्या या बैठकीत माजी महापौर आर. एस. कुमार, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आनंदराव मुळूक, पर्यावरणप्रेमी सूर्यकांत मुथियान, भाजपाचे बाळा शिंदे, अतुल इनामदार, राधिकाताई बोरलिकर, मनसेचे बाळा दानवले, ओंकार पाटोळे, राष्ट्रवादीचे निलेश शिंदे, स्वप्नपूर्ती सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र हिंगे, श्रीधर दैठणकर, शर्मिलाताई महाजन, हेमंत पटवर्धन, गणेश बोरा, श्री चिंतामणी गणपती ट्रस्टचे विलास पाटणे, जगन्नाथ वैद्य, शिवसेनेचे प्रशांत साबळे, राजिव मेनन, संघाचे जयेश मोरे, रमेश सरदेसाई, सुशांत बुचके, जी. ए. ढोरे, अनिल मळेकर, अमित कांबळे, मिलिंद रचपुत, गणेश जाधव, अजय मोरे, भागवत नागपुरे, रुद्र बैरागी, ऋषिकेश कांबळे यांच्यासह अनेक सोसायट्यांचे अध्यक्ष, सदस्य आणि प्राधिकरणमधील नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळा दानवले आणि शर्मिलाताई महाजन यांनी केले.
