पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ६ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
भोसरी: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरात शिस्त आणण्यासाठी आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अनेक चांगले उपक्रम कागदावर राबविले जातात. मात्र, नेहमीप्रमाणेच कालांतराने या उपक्रमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते आणि पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ या उक्तीप्रमाणे परिस्थिती जैसे थे होऊन बसते. याचाच अत्यंत संतापजनक प्रत्यय सध्या भोसरी परिसरात पाहायला मिळत आहे. भोसरी येथील आळंदीकडे जाणाऱ्या मुख्य वळणावर (Alandi Turn) कडक बंदी असतानाही रिक्षाचालकांनी बेकायदेशीरपणे रिक्षा उभ्या करून थेट पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशाला हरताळ फासला आहे. या बेजबाबदार रिक्षांमुळे पायी चालणारे नागरिक, वाहनचालक आणि महिलांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
या गंभीर समस्येवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (कै. अजितदादा पवार गट) अर्बन सेलचे शहराध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी तीव्र संताप व्यक्त करत पोलीस प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर घणाघाती टीका केली आहे. भोसरीतील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असताना “वाहतूक नियंत्रण पोलीस नेमके गेले कुठे?” असा संतप्त सवाल आज शहरातील प्रत्येक सामान्य नागरिक विचारत आहे. प्रदीप गायकवाड यांनी आरोप केला की, वाहतूक पोलीस फक्त मोक्याच्या आणि स्वतःच्या फायद्याच्या ठिकाणीच नियुक्त केलेले दिसतात. केवळ अतिसंवेदनशील चौक असेल तरच पोलीस रस्त्यावर कर्तव्य बजावताना दिसतात. अन्यथा, शहरातील अंतर्गत चौक, वळणे आणि रस्त्याच्या दुतर्फा अत्यंत बेजबाबदारपणे उभी असणारी अनधिकृत वाहने याकडे आयुक्त श्री. विनयकुमार चौबे आणि संपूर्ण वाहतूक नियंत्रण पोलीस यंत्रणा उघड्या डोळ्यांनी दुर्लक्ष करत असून ही समस्या सोडविण्यास ते अजिबात तयार नाहीत. शहरातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना प्रदीप गायकवाड यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींनाही चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले, “शहरात पूर्वी नगरसेवक होते तरीही शहर भकास होते आणि आज प्रशासकीय राजवटीत नसले तरीही शहर भकासच आहे, अशी अत्यंत लाजीरवाणी परिस्थिती निर्माण झाली आहे. मूळ गावावाला किंवा स्थानिक नगरसेवक या वाहतूक कोंडीच्या समस्येत अजिबात लक्ष घालण्यास तयार नाही; कारण तो पैशाचा प्रचंड धुराळा उडवून निवडून आलेला असतो. अशा प्रकारे निवडून आलेल्या नगरसेवकाला जनतेच्या कामाशी काहीही देणेघेणे नसते. कोणत्यातरी लांबच्या गावाकडून येथे स्थायिक झालेले आणि निवडून आलेले नगरसेवक शहर विकासाच्या दृष्टीने पूर्णपणे कुचकामी ठरले आहेत. त्यांना फक्त ‘नगरसेवक’ ही पदवी हवी होती, ती त्यांना मिळाली. मात्र, शहरातील नागरी समस्या सोडविण्याच्या खटपटीत पडण्याचा कोणताही प्रामाणिक हेतू त्यांच्या मनात नसतो, असा सध्याचा दुर्दैवी फंडा सुरू आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्बन सेलचे शहराध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी पोलीस आयुक्तांना इशारा दिला आहे की, भोसरी आळंदी वळणावरील बेकायदेशीर रिक्षा चालकांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करून तिथली वाहतूक कोंडी सोडवावी. जर वाहतूक पोलिसांनी या समस्येकडे त्वरित लक्ष दिले नाही, तर सर्वसामान्य नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. “आम्ही सामान्य जनतेची कामे करत आलो आहोत आणि यापुढेही कडक भाषेत प्रशासनाला जाब विचारून काम करतच राहू,” असा निर्धार गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
