पिंपरी (मॅक्स मंथन डेली न्यूज): पंडित नेहरूंच्या दूरदृष्टीमुळेच देशाची प्रगती! कामगार नेते काशिनाथ नखाते यांचे प्रतिपादन!
आधुनिक भारताचा आजचा जो अचंबित करणारा यशस्वी प्रवास आहे, तो पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विशाल दृष्टीमुळेच शक्य झाला आहे, असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले आहे. धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समता आणि प्रतिष्ठा या मूल्यांवर आधारित, कायद्याने नियंत्रित लोकशाही राष्ट्र ही पंडित नेहरूंची भारताविषयीची संकल्पना होती. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील ते एक महान नायक होते आणि देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटवला आहे.
आजकाल देशभरात विरोधी पक्षाचे महत्त्व कमी करण्याचा आणि त्यांना संपवण्याचा प्रयत्न होत असताना, पंडित नेहरूंच्या लोकशाही मूल्यांची आठवण येते. ते लोकशाहीत विरोधी पक्षाला अधिक महत्त्व देत असत. त्यांची मते जाणून घेत आणि रचनात्मक विरोधाचे स्वागत करून त्यांनी नेहमीच विरोधकांना प्रोत्साहन दिले, असे काशिनाथ नखाते म्हणाले.
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, बांधकाम कामगार समिती आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात राजेश माने, सुनील भोसले, सलीम डांगे, महादेव गायकवाड, प्रदीप गावंडे, संजय मधाळ, वर्षा माने, गीता सूर्यवंशी, रेखा वाघमारे, स्वाती लंघे, उषा भोसले यांच्यासह अनेक कामगार उपस्थित होते.
यावेळी बोलताना काशिनाथ नखाते म्हणाले की, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आयआयटी आणि एम्ससारख्या संस्थांची निर्मिती करून देशाला आत्मनिर्भर बनवले. त्यांच्या दूरगामी विचार आणि कृतीमुळेच आज देश प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे. पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेले कार्य आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील महानता देशाला आजही जाणवते. त्यांची निस्वार्थी वृत्ती, लोकशाहीवादी स्वभाव आणि विनम्रता यामुळे देशासह जगात त्यांचा नावलौकिक राहिला.
आज विरोधकांना निष्प्रभ करण्याचा प्रयत्न सुरू असताना, पंडित नेहरूंच्या उदात्त विचारांची देशाला तीव्र आठवण येत आहे, असेही नखाते यांनी नमूद केले.