मोठी बातमी: राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर; अजितदादांच्या निधनामुळे निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ३० जानेवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या काळात निवडणूक प्रक्रियेचे कामकाज आणि राजकीय प्रचार पूर्णपणे थांबल्याने, राज्य निवडणूक आयोगाने (SEC) जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या मतदानाची आणि मतमोजणीची तारीख बदलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी संध्याकाळी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आता नवीन तारखा खालीलप्रमाणे असतील:
-
मतदान: ७ फेब्रुवारी २०२६ (सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०).
-
मतमोजणी: ९ फेब्रुवारी २०२६ (सकाळी १० वाजल्यापासून).
-
प्रचाराची सांगता: ५ फेब्रुवारी २०२६ (रात्री १० वाजता).
-
राजपत्रित अधिसूचना (निकाल): ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रसिद्ध केली जाईल.
यापूर्वी मतदान ५ फेब्रुवारी आणि मतमोजणी ७ फेब्रुवारी रोजी होणार होती. मात्र, २८ जानेवारी रोजी अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आणि २८ ते ३० जानेवारी दरम्यान शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला. या काळात उमेदवारांना प्रचार करणे आणि प्रशासनाला निवडणूक तयारी करणे शक्य नसल्याने, निवडणूक प्रक्रियेला दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
ही निवडणूक राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी पार पडणार आहे. यामध्ये प्रामुख्याने पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश आहे. सुमारे २५,४८२ मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडेल.
आयोगाने स्पष्ट केले आहे की, आचारसंहिता निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत लागू राहील. तसेच, १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होत असल्याने, निवडणूक प्रक्रिया ११ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
