काळीज पिळवटून टाकणारी घटना! धाणी तालुक्यातील दिया गावात दोन सख्ख्या बहिणींचा नदीत बुडून मृत्यू; वाचवण्याच्या प्रयत्नात दोघींनी गमावला जीव
धारणी (मेळघाट), प्रतिनिधी विलास सावळे, दिनांक: ६ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:
धारणी (मेळघाट): अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील दिया गावातून एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सपण नदीत आंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींचा बुडून मृत्यू झाला. लहान बहीण वाहून जात असताना तिला वाचवण्यासाठी मोठ्या बहिणीने नदीत उडी घेतली, मात्र पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे दोघींचाही करुण अंत झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दिया गावच्या रहिवासी असलेल्या आस्था गिरी (९ वर्षे) आणि आराधना गिरी (१४ वर्षे) या दोन बहिणी सोमवारी सकाळी ११:३० च्या सुमारास आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत सपण नदीवर गेल्या होत्या. नदीत आंघोळ करत असताना अचानक लहान बहीण आस्था पाण्याचा अंदाज न आल्याने प्रवाहासोबत वाहून जाऊ लागली.
आपल्या लहान बहिणीला बुडताना पाहून मोठी बहीण आराधना हिने कसलाही विचार न करता तिला वाचवण्यासाठी नदीत उडी मारली. आराधनाने बहिणीला पकडण्याचा शर्थीचा प्रयत्न केला, परंतु नदीचा प्रवाह इतका वेगवान होता की दोघींनाही स्वतःवर नियंत्रण मिळवता आले नाही. पाण्याचा ओघ जास्त असल्याने काही क्षणांतच त्या दोघीही डोळ्यादेखत नाहीशा झाल्या.
सोबत असलेल्या मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शोधमोहीम राबवून दोघींचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण दिया गावावर आणि मेळघाट परिसरावर मोठी शोककळा पसरली आहे.
धारणी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची (AD) नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. खेळण्याच्या वयात दोन चिमुकल्या जीवांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

